बीड (रिपोर्टर): कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले. केंद्र सरकारचे धोरण चुकीचे असल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. पिकांना योग्य भाव मिळायला हवा यासाठी माजलगाव येथे राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या न्या डॉ. मधुरा स्वामीनाथन, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, डॉ. उमेश देशमुख यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगून कापसाला 12 हजार तर सोयाबीनला 8 हजार रुपये भाव असायला हवा, अशी आमची मागणी असल्याचे किसान सभेचे अॅड. अजय बुरांडे यांनी म्हटले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुरलीधर नागरगोजे, कॉ. पी.एस. घाडगे, डॉ. अशोक थोरात, कॉ. मोहन जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बुरांडे पुढे म्हणाले की, हमीभाव संदर्भात 7 मार्चला माजलगाव येथे राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषद होत आहे. या परिषदेमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यासाठी शेतीचे अभ्यासक मधुरा स्वामीनाथन, डॉ. अशोक ढवळे, अजित नवले, उमेश देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या. केंद्र शासनाची भूमिका चुकीची आहे त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. कापसाला 12 हजार तर सोयाबीनला 8 हजार भाव मिळाला तरच शेतकर्यांना थोडं परवडू शकतो. शेतीतून निघणार्या उत्पन्नातून खर्चही निघणे मुश्किल झाल्याची खंत बुरांडे यांनी व्यक्त केली. दरम्यान राज्यव्यापी परिषदेला शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.