बीड- मी मंचावर का आले? याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला आल्या नाहीत. त्या संसदेच्या अधिवेशनात आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला आली आहे. परळीची कन्या म्हणूनही मी इथे आली आहे. आणि या परळीचा विकास होण्यासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी माझी आहे. हे दाखवण्यासाठी आणि एक चांगला संदेश देण्यासाठी मी मंचावर आले आहे, असं त्या म्हणाल्या.परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
माझ्या राजकारणाच्या जीवनात मी पालकमंत्री होते. तेव्हा जात -पात पाहिली नाही. पक्ष देखील पाहिला नाही. मनात द्वेष ठेवला नाही. त्यामुळे या लोकांचं कर्ज माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर आले. आमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांना परळीच्या जनतेने प्रेम दिलं आहे. त्यामुळे परत त्यांना काही देणं आमचं कर्तव्य आहे, असं मुंडे म्हणाल्या.
जिल्ह्यात 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना मनापासून एक इच्छा होती की वैद्यनाथांच्या तीर्थ क्षेत्राचा विकास करायचा आहे. अत्यंत चांगलं काम व्हावं अशी दखल सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. मी धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करते. त्यांच्या नेतृत्वात आता काम सुरु झालं आहे. अत्यंत चांगले काम व्हावं अशी आशा आहे, असं मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्यावर यावर पंकजा काही बोलतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावर बोलताना त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याने पारा वाढलाय असं म्हणत त्यांनी वातावरण हलकं फुलकं केलं.