दोन दिवसात एसआयटी स्थापन करू
बीड (रिपोर्टर): माझं घर आणि बीड जळत होतं तेव्हा पोलीस काय करत होती? पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? दंगेखोर शहर जाळत होते तेव्हा पोलीस त्यांच्या पाठीमागे चालत होती, असे एक ना अनेक सवाल विचारून आ. संदीप क्षीरसागर यांनी या जाळपोळीत मराठा आंदोलक अथवा इतर जातीचे कोणीही नव्हते तर ही जाळपोळ प्रुप्लॅन होती. या मागचा मास्टरमाइंड कोण? असा सवाल विचारला. याच मुद्यावर जयंत पाटील यांनी जाळपोळ करणार्यांविरोधात आक्रमक भूमिका का घेण्यात आली नाही? पोलीसांनी दंगेखोरांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? असा सवाल उपस्थित करून पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा भाच्चा आहे. या घटनेमागे नेमके कोण? असे एक ना अनेक सवाल विचारत या प्रकरणी अद्याप पालकमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे सांगितल्यानंतरही एसआय स्थापन का करण्यात आली नाही? असा सवाल जयंत पाटलांनी विचारल्यानंतर दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.
नागपूर अधिवेशनात आज अपेक्षेनुसार बीडमधील जाळपोळ प्रकरण चांगलच गाजलं, या वेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी घटनाक्रम सांगताना घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो, अनेकांच्या दुकाना फोडण्यात येत होत्या, कार्यालये जाळण्यात येत होते, माझ्या घरावरही लोक हल्ला करून आले, दगडफेक केली, घराला आग लावली, हा प्रकार सहा ते सात तास चालू होता. तेव्हा पोलिसांची गाडीही तिथे होती, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. ही जाळपोळ नियोजीत होती, घराच्या लाईट तोडल्या जात होत्या, पाण्याचे कनेक्शन तोडले जात होते, दंगेखोर पुढे चालत होते. पाठीमागे पोलीस चलत होती, अशा भयावह परिस्थितीत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पेट्रोल, फॉस्फोरसचे बॉम्ब फेकले जात होते तरीही पोलीस काहीच करत नव्हती. त्या पाच ते सात तासांच्या कालावधीत पोलिसांचे हात नेमके कोणी बांधले होत? असा जळजळीत सवाल संदीप क्षीरसागरांनी विचारला. त्याचबरोबर या प्रकरणातला मास्टरमाइंड कोण? याचा शोध घेण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दंगेखोरांनी सर्वच पक्षांचे कार्यालये आणि घरे जाळले, संदीप क्षीरसागरांनी सांगितलेली व्यथा अत्यंत गंभीर आहे,
अशा घटनांकडे राजकारणाच्या पलिकडे जावून पहायला पाहिजे. घटना घडली तेव्हा पोलीस बळ कमी होतं, प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळा जमाव होता, या प्रकरणात आतापर्यंत 278 आरोपींना अटक करण्यात आली आहे, यात तीस आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आणखी माजलगावच्या प्रकरणात चाळीस तर बीडच्या जाळपोळ प्रकरणातील 61 आरोपी फरार आहेत. पोलिसांची संख्या कमी आणि दंगलखोर जास्त असल्यामुळे ती घटना आटोक्यात आली नाही. फडणविसांनी असे उत्तर दिल्यानंतर जयंत पाटलांनी यावर आक्रमक भूमिका घेत बीड एसपीला या घटनेबाबत तीन दिवस आधीच माहिती होती, त्यावर एसपींनी उपाययोजना का केल्या नाहीत? सकाळी माजलगावमध्ये घटना घडते आणि एसपी तिथे जावून बसतात, बीड जळत असताना एसपींना शहरात येऊ वाटलं नाही. हे संशयास्पद नाही का? पोलीस कमी असतील त्यात दुमत नाही, पोलीस कमीच असतात, पंरतु जमावाला पांगण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? पालकमंत्री धनंजय मुंडेंनी एसआयटीची मागणी केल्यानंतरही अदद्याप एसआयटी स्थापन का केली नाही? फडणवीस साहेब, यामध्ये तुमचा इंट्रस्ट काय? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. पप्पू शिंठदे हा एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा भाच्चा आहे. पप्पूचे लागेबांधे कोणाशी आहेत? सराईत गुन्हेगार हल्लेखोर होते तर पोलिसांना ते का दिसले नाहीत? असे एक ना अनेक सवाल विचारल्यानंतर फडणविसांनी या प्रकरणी दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.