लातूर(रिपोर्टर): एका विवाहासाठी बीड येथील दाम्पत्य लातूर येथे गेले होते. रिक्षातून घराकडे जात असताना त्यांच्या पिशवीतील 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी लातूर येथील पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथे एसटी महामंडळात असलेले मुकुंदराव किंबहुणे हे लातूर येथील आपल्या पाहुण्यांच्या विवाहासाठी मंगळवारी गेले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महााज चौकात ते उतरले होते. त्यानंतर त्यांना ड्रायव्हर कॉलनीत जायचे होते त्यासाठी ते एका रिक्षात बसले होते. त्या रिक्षात दुसर्या दोन सहप्रवासी महिला होत्या. किंबहुणे दाम्पत्य ड्रायव्हर कॉलनी येथे आले असता रिक्षातून खाली उतरले. घरी गेल्यानंतर पिशवी उघडून पाहिली असता आतील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात दोन तोळ्याची मोहन माळ (किंमत 16 हजार), साडेतीन तोळ्याचा पोहेहार (किंमत 25 हजार), साडेतीन तोळ्याचे गंठण (किंमत 25 हजार), दोन ग्रॅम मणी (दोन हजार रुपये), पाच तोळ्याच्या बांगड्या 25 हजार रुपये, साडेतीन ग्रॅम खड्याची अंगठी (किंमत 3 हजार 600), तीन ग्रॅमची वजरटिक (किंमत 3 हजार) असा एकूण 15 तोळ्यांचा ऐवज लंपास करण्यात आला. याची एकूण किंमत 99 हजार 800 रुपये इतकी आहे. या प्रकरणी सुरेखा मुकुंदराव किंबहुणे (रा. पिंगळे गल्ली, महालक्ष्मी गल्लीच्या पाठीमागे बीड) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.