मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाला वेगळं आरक्षर द्या, अशी आमची सुरुवातीपासून भूमिका आहे मात्र झुंडशाहीपुढे नमते घेऊन मागच्या दाराने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे काम चालू आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हिम्मत असेल तर मंडल आयोग रद्द करून दाखवा हे माझे ओपन चॅलेंज आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारने मराठ्यांना दिलेल्या आरक्षणाविरोधात न्यायालयाची आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे म्हटले. राजीनाम्यावर मात्र त्यांनी बोलायचे टाळले.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, ज्यांना 3 कोटी आणि 3 लाखांमधला फरक कळत नाही असे लोक मंडल आयोगाला आव्हान देणार आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोग रद्द करून दाखवावा, असे ओपन चॅलेंज त्यांनी थेट जरांगे यांना दिले. राज्य सरकारच्या धोरणावरही त्यांनी नाराजी व्यक्त करून झुंडशाहीपुढे नमते घेऊन मागच्या दाराने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर गावागावात विजयाचा उन्माद सुरू असल्याचा आरोप करून ओबीसी लोक काही गावातून गाव सोडून जात असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने दिलेल्या आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगून रस्त्यावर उतरूनही आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळांची हकालपट्टी करा
महायुतीत धूसफूस
शिंदे समर्थक आमदार भडकले
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निशाना साधत छगन भुजबल यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी गायकवाड यांनी केली तर आरक्षणावर राजकारण करणार्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा टोला आ. संजय सिरसाट यांनी भुजबळांना लगावला.
भुजबळांच्या भूमिकेवर बोलताना गायकवाड म्हटले, मंत्रिमंडळातील सदस्य असणारे छगन भुजबल हे तिरस्काराची भूमिका घेत आहेत. हा तिरस्कार बरा नाही, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवायला नको, त्यांना बाहेर काढायला हवे. मंत्रिपदाची शपथ घेताना राज्यातील सर्व जनतेच्या हिताच्या गोष्टी करतात आणि आता एका समाजाचा तिरस्कार करतात हे चुकीचे आहे. उलट गेली सत्तर वर्षे तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाहीत. तो समाज सोयींपासून वंचीत राहिला. आता त्याचे प्रमाणपत्र सापडले तर कुणाचा बाप त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून रोखू शकत नाही, असेही गायकवाड यांनी म्हटले तर शिवसेना प्रवक्ते संजय सिरसट यांनी भुजबळांचे वागणे योग्य नसल्याचे म्हटले. यावरून महायुतीत धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जाते.