
गावकर्यांना पाणी नाही, टँकर मागवण्याची वेळ
शेतीला पाणी सोडणार्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी
बीड, (रिपोर्टर) ः ग्रामपंचायतच्या शासकीय विहिरीचे पाणी गावकर्यांना मिळत नाही. मात्र, ज्या शेतकर्यांच्या शेतात विहिर खोदण्यात आली ते शेतकरी ग्रा.पं.च्या विहिरीच्या पाण्याचा वापर करत असल्याचा प्रकार कुक्कडगाव येथे घडत आहे. गावकर्यांना पाणी नसल्याने टँकर मागवण्याची वेळ आली. स्वतःची विहिर समजून जे शेतकरी सरकारी विहिरीचे पाणी आपल्या शेतीला वापरतात. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली.
बीड जिल्ह्यातल्या अनेक गावात पाण्याची टंचाई आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे व विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जाऊ लागला. कुक्कडगाव येथे ग्रामपंचायतने सिंदफणा नदीच्या काठी दोन विहिरी खोदल्या. त्या विहिरी शेतकर्यांच्या शेतात खोदण्यात आल्या. सदरील शेतकर्याने विहिर खोदण्याबाबतचे संमती व हमी पत्र दिले आहे. त्या विहिरींना चांगले पाणी आहे. विहिरीचे पाणी गावकर्यांना मिळण्याऐवजी ज्या शेतकर्यांच्या शेतात विहिरी आहेत. ते शेतकरी आपल्या शेतातील पिकांना विहिरीचे पाणी देऊ लागले. गावात पाणी नसल्याने टँकर मागवण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे मात्र, विहिरीला पाणी असताना त्याचा वापर शेतकरी करू लागल्याने संबंधिताविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.