सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी
बीड (रिपोर्टर)
बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असल्याने २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत जिल्हाभरात ५० पेक्षा जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारपासून इच्छुक उमेदवारांची संबंधित तहसीलदार कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊ शकते. ३० डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.’
ग्रामपंचायतीला गेल्या काही वर्षांपासून महत्व आलेले आहे. त्यामुळे सरपंचपद मिळवण्यासाठी गाव पुढारी स्पर्धेत उतरत असतात. गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका घोषीत झाल्यापासून संबंधित गावचे पुढारी कामाला लागले. २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत जिल्हाभरात ५० पेक्षा जास्त इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असल्याने सोमवारपासून संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होऊ शकते.
शिवसेना लागली निवडणुकीच्या कामाला
जिल्हाभरातील १२९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असल्याने या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न शिवसेना करू लागली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव हे कालपासून बीड जिल्ह्यामध्ये डेरेदाखल आहेत. काल यांनी केज येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावून ग्रा.पं.वर भगवा फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले तर आजही जाधव बीड येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेणार आहेत.
गेवराई तालुक्यातील
तीन ग्रा.पं.कडे तालुक्याचे लक्ष
गेवराई तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये तलवाडा, मादळमोही, गढी या तीन ग्रामपंचायती मोठ्या आहेत. या तिन्ही ग्रामपंचायतींकडे तालुक्याचं लक्ष लागून आहे. स्थानिक पातळीवरील गाव पुढारी सदरील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तलवाडा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत. २२ ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत १० इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल केले होते.
शैक्षणिक प्रमाणपत्राची अट
९५ नंतरच्या उमेदवारांसाठी
ग्रामपंचायती निवडणुकीसाठी आता शिक्षणाची अट निवडणूक विभागाने घातली आहे. अंगठे बहाद्दर असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही, १-१-१९९५ नंतर जन्म झालेल्या उमेदवारांना सातवीपर्यंत शिक्षण असणे गरजेचे करण्यात आले आहे.