आ.पवारांनी घेतली भेट ; तात्काळ रस्ता खुला करून देण्याचा दिल्या सूचना
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील मौजे बेलगुडवाडी येथील ६० ते ७० शेतकर्यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत अनेकवेळा प्रशासनाला निवेदने देऊन पाठपुरावा केला मात्र याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकर्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज सकाळपासून गेवराई तहसिल कार्यालयासमोर महिला व मुलाबाळांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक ८६ मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता काही शेतकर्यांनी आडविल्यामुळे येथील अनेक शेतकर्यांचा ऊस या रस्त्यामुळे उभाच असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकर्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. परंतु प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने आज दि.२८ रोजी येथील सर्व ग्रामस्थांनी महिला व मुलाबाळांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आमच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी श्रीराम पवार,ऋषिकेश पवार,रणजित पवार,आण्णा पवार, रामकीसन पवार, देविदास पवार, शरद पवार, अंगत पवार, एकनाथ पवार, भागवत पवार, पप्पू पवार, शेषेराव पवार, नगुजी पवार, राखमाजी भिल्लारे, महिलांमध्ये मंजुळाबाई पवार, भागूबाई पवार, शांताबाई पवार, किस्किंदा पवार, सारस्वतीबाई पवार, आदी महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दरम्यान, आ.लक्ष्मण पवार यांनी या आंदोलकांची भेट घेऊन संबंधित अधिकार्यांना याबाबत तात्काळ निर्णय घेऊन या ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना दिल्या असून याबाबत आपण लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास या आंदोलकांना दिला.