बीड (रिपोर्टर)- माजलगाव, बिंदुसरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो असताना शहरवासियांना १५ दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर शहरामध्ये विकास कामाच्या नावाखाली नुसतं राजकारण केलं जात आहे. नगरपालिका प्रशासन नागरिकांना सुविधा पुरवण्यास अपयशी ठरल्याने न.प.च्या निषेधार्थ आज शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिकेवर हंडा बजाओ मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. या मोर्चामध्ये डोक्यावर हंडा घेऊन महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नगरपालिका हाय हाय, हिटलरशाही मुर्दाबाद यासह इतर घोषणांनी शहर दणाणून गेलं होता. मोर्चाच्या अनुषंगाने नगरपालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदाबेस्त तैनात करण्यात आला होता.
डॉ. क्षीरसागर यांच्या ताब्यात गेल्या तीस वर्षांपासून नगरपालिका आहे. इतकी वर्षे नगरपालिका ताब्यात असूनही शहरवासियांना नागरी सुविधा मिळत नाहीत. यावर्षी चांगला पाऊस झाला. माजलगाव आणि बिंदुसरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो भरली, तरी शहरवासियांना पंधरा दिवसआड पाण्याचा पुरवठा केला जातो. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. नाल्या, रस्त्यांचे प्रश्नही नगरपालिका सोडवू शकली नाही. अनेक वार्डामध्ये जाण्यासाठी व्यवस्थीत रस्ता नाही. नगरपालिका अंतर्गत जी हद्दवाढ झाली त्या ठिकाणी पक्के काय कच्चे रस्तुसद्धा नाही. तेथील नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. शहर स्वच्छ असल्याच्या वल्गना केल्या जातात मात्र जागोजागी कचर्याचे ढिग आढळून येतात. अस्वच्छतेमुळे विविध आजारांची लागण होत आहे. यासह इतर प्रश्न गेऊन शिवसंग्रामने आज नगरपालिकेवर हंडा बजाओ मोर्चा काढला. या मोर्चाने शहर दणाणून गेले होते. महिलांनी डोक्यावर हंडे घेून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. नगरपालिकेचा निषेध करत नगरपालिका प्रशासन हाय हाय, हिटलरशाही मुर्दाबाद यासह अन्य घोषणांनी शहर दणाणून गेले होते. मोर्चाच्या अनुषंगाने नगरपालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.