पक्षी मृत झाल्यास परस्पर विल्हेवाट लावू नका, पशूसंवर्धन विभागाला कळवा -ढेरे
आष्टी (रिपोर्टर)-पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अकरा कावळे बर्ड फ्ल्यूने मेल्याचा अहवाल आल्यानंतर या भागामध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असतानाच आज आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे दोन कावळे मृत अवस्थेत आढळून आल्याने या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मृत पक्षीस आढळल्यास त्यांची परस्पर विल्हेवाट न लावता त्याबाबतची माहिती पशूसंवर्धन विभागाला कळविण्यात यावी, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी मंगेश ढेरे यांनी केले आहे.
आष्टी, पाटोद्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मुगगाव येथे गेल्या काही दिवसांपुर्वी अकरा कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदरील कावळे हे बर्ड फ्ल्यूमुळे मेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परिसरातील 12 गावांना अलर्ट करण्यात आलेले आहे. तेथील कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी लावण्यात आलेली आहे. तोच आज सकाळी आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे दोन कावळे मृतअवस्थेत आढळून आल्याचे ग्रामसेवक देशमुख यांनी प्रशासनाला कळविल्याने प्रशासनात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मृत पक्ष्यांची परस्पर विल्हेवाट न लावता याची माहिती पशुसंवर्धन विभागाला कळवावी, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी केले आहे.
प्रशासनास सहकार्य करा
-तहसीलदार दळवी
बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आष्टी तालुक्यातील पांगुळव्हाण व ब्रह्मगावमध्ये कोंबडया, अंड्यांची वाहतुक व खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 गावे कंटेनमेंट झोन म्हणून गोषीत करण्यात आले आहेत तरी या परिसरातील नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून प्रशानास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.