गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे राज्य शासनाचे आदेश
मुंबई (रिपोर्टर) विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह, माजी मंत्री धनंजय मुंडे व विरोधी पक्षाच्या विविध सदस्यांनी विधिमंडळात गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकर्यांना मदत देण्याबाबत केलेल्या मागणीला यश येताना दिसत असून, राज्य शासनाने यासंदर्भात बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील सोयाबीन व अन्य ज्या पिकांचे गोगलगायीनी नुकसान केले, त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे पारित केले आहेत.
बीड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार, 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले असून, या शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास द्यावेत, ज्या शेतकर्यांचे नुकसान 33% पेक्षा अधिक असेल त्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यात सोयाबीन या प्रमुख पिकास ऐन उगवल्यानंतर गोगलगायीनी शेंडे खाउन फस्त केले होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात आढळलेल्या गोगलगायी गोळा करून मीठ लावून त्यांना नष्ट करत व पुन्हा पेरणी करत. अनेक शेतकर्यांना तर तीन-चार पेरण्या करूनही काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करून, शेतकर्यांशी व स्थानिक प्रशासन, कृषी विभाग आदींशी चर्चा करून धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी देखील गोगलगायी ग्रस्त अंबाजोगाई व लातूर जिल्ह्यातील शेतींना भेटी देऊन पाहणी केली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, लक्षवेधी तसेच विविध संसदीय आयुधे वापरून या दोनही नेत्यांसह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही गोगलगायी बाधित शेतकर्यांना मदत करण्याबाबत सभागृह दणाणून सोडले होते. त्यानुसार पारित झालेले आदेश पाहता, गोगलगायी ग्रस्त शेतकर्यांना दिलासा व आर्थिक मिळेल हे निश्चित झाले आहे.
दखल घेतल्याचे समाधान मात्र मदत सरसकट द्या – धनंजय मुंडे
हजारो हेक्टर वरील सोयाबीन क्षेत्राच्या चार-चार पेरण्या करूनही शेतकर्यांना गोगलगाय नियंत्रण नाही व पीकही हाती लागणार नाही, अशा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीची, पीडित शेतकरी व आमच्या मागणीची सरकारने दखल घेतली याचे समाधान जरी असले तरी, या पेरण्यांचा खर्च किती वाया गेला असेल याचा अंदाज सरकारने लावणे गरजेचे आहे. नुकसानीची आकडेवारी व शेतकर्यांची दयनीय अवस्था समोर असताना पुन्हा निकष, पंचनामे, 33% कशासाठी, गोगलगायी ग्रस्त शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात यावी, या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.