अहमदनगर (रिपोर्टर)- काल करोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
महापालिका रुग्णालयातील दोघींचा तर जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेचा यात समावेश आहे. काल दुपारी लस घेतल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागला. त्यामळे त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. अशा रुग्णांसाठी तेथे १२ खाटांचा खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आज लसीकरण बंद असून यापुढे एक दिवसाआड लस देण्यात येणार आहे.
कोविड आजारावरील बहुप्रतिक्षित लस देशभरात पोहोचल्यानंतर काल लसीकरणाला शुभारंभ झाला. राज्यातील विविध जिल्ह्यांत आरोग्यसेवकांना प्राधान्यानं लस देण्यात आली. नगर जिल्ह्यात १२ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी १२०० जणांना लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात ८७१ जणांनी उपस्थित राहून लस टोचून घेतली. लसीकरणा-नंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. लस घेतलेल्यांपैकी दोघींना रात्री तर एकीला सकाळी त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. लस घेतलेल्या अन्य कर्मचार्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.