बीड (रिपोर्टर)बीड जिल्ह्यात मुलं पळविणारी टोळी आली असल्याची अफवा सोशल मिडियावरून पसरविली जात आहे. त्यामुळे पालक-विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीही गोंधळून गेली आहे. जिल्ह्यात अशी कुठलीही टोळी नसून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले. कुठलीही शहानिशा न करता सोशल मिडियावर अफवा पसरविणारी पोस्ट व्हायरल केल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असेही पोलीस अधिक्षक म्हणाले.
अंबाजोगाई शहरात मुलं पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीही गोंधळून गेली आहे. काही विद्यार्थी भीतीपोटी शाळेत जात नाहीत. ही अफवा वेगाने जिल्ह्यात पसरली आहे. याबाबत रिपोर्टरने थेट पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या तरी जिल्ह्यात अशी कुठलीही टोळी नाही. पोलिसांचा सर्वत्र तगडा बंदोबस्त आहे. विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे शाळेत जावे, अफवा पसरविणार्यांवर कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले.
योगेश्वरीची ती नोटीस व्हायरल
अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी नूतन विद्यालय मंदिर विभाग अंबाजोगाई यांनी विद्यार्थी पालक आणि ऑटोरिक्षा चालकांसाठी एक महत्वाची सूचना काढल्याची नोटीस सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘सर्व विद्याथी, पालक व ऑटो चालक यांना सूचीत करण्यात येते की, अंबाजोगाई शहरामध्ये मुले पकडणारी (किडनॅप) टोळी असल्याचे समजते. तेव्हा आपण आपल्या पाल्यांच्या बाबतीत सतर्क रहावे व आपले पाल्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नाही याची खात्री करून घ्यावी व आपण आपल्या पाल्याच्या ऑटोरिक्षा चालकाला सुद्धा ही सूचना द्यावी व शाळेच्या गेटमध्ये पाल्यास सोडण्याची सक्त ताकिद द्यघावी. तसेच पाल्यास शाळेतून घेऊन जाण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पाठवू नये, अशा आशयाची नोटीस व्हायरल होत आहे.
अन् ग्रामीण पोलिसांची धावाधाव
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादाहरी वडगाव येथेही अशीच अफवा पसरली होती. येथील सातवी-आठवीत शिकणारे तीन विद्यार्थी काल मित्राच्या शेतात जेवणासाठी गेले मात्र अफवा पसरल्याने त्यांच्या नातलगांनी थेट पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याचे गांभीर्य घेत तात्काळ मुलांचा शोध लावला मात्र ते मित्राच्या शेतात जेवण करत असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.