गणेश सावंत
मो. नं. 9422742810
अर्ध्या हळकुंडावरचे लग्नाळू
बीड जिल्ह्याच्या तीन पिढ्यांचे स्वप्न साकार झाले. आष्टीतून अखेर नगरसाठी रेल्वे धावली. कालचा तो सोहळा आनंदोत्सव साजरा करणारा होता की, रेल्वेसाठी दुखांकित असलेल्या जिल्हावासियांच्या जखमेवर मिठ चोळणारा होता. यावर भाष्य करण्यापेक्षा आहे त्यात समाधानी मानणारे आम्ही जिल्हावासी. भविष्यकाळाचा वेध घेत चांगल्याची अभिलाषा बाळगत बसू, ‘केल्याने होत आहे रे, ते आधी केलेच पाहिजे’, या भूमिकेत संघर्षाची नाळ असलेले आम्ही पुन्हा आष्टी-बीड-परळी या रेल्वेसाठी आंदोलनाच्या भूमिकेत राहू. संघर्ष हा आमच्या नसा-नसात भिनलेला आणि आमच्या पाचवीलाही पुजलेला. परंतु केवळ राजकीय आखाड्यामध्ये आपलाच मल्ल हाबूक ठोकणारा असावा आणि उपस्थितांना आपल्या मल्लाचा खुराक दाखवण्याहेतू जो खटाटोप होतो त्याचा नक्कीच राग येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी जिल्हावासी प्रयत्नशील आहेत. परंतु हा रेल्वे मार्ग गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात आष्टीपर्यंत पुर्णत्वास जावू शकला. हा परळीपर्यंत कधी जाईल? हे सांगणे कठीण आहे. साठ-चौसष्ट किलोमीटरला दहा वर्षांचा कालावधी लागत असेल तर शे-दिडशे किलोमीटरला किती वर्षाचा कालावधी लागेल हा प्रश्न याठिकाणी कोणीही उपस्थित करू शकेल. ज्या वेगाने रेल्वे मार्गाचे काम व्हायला हवे, तो वेग रेल्वे कामात नसला तरी श्रेय घेण्यासाठी राजकारणी मात्र वेगवान कार्यक्रम घेऊन स्वप्न साकार झाल्याची धन्यता दाखवत आहेत. केवळ आणि केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेचे कार्यक्रम घेतले जात असतील आणि आमच्यामुळेच रेल्वे धावली हे दाखवण्याचा प्रयास केला जात असेल तर या रेल्वेसाठी आंदोलन करणार्या त्या हजारो-लाखो आंदोलकांचे काय? इमाने इतबारे बीडला रेल्वे यावी यासाठी प्रयत्न करणार्या असंख्य कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांचे काय? परंतु आपला मल्ल किती दमदार आहे आणि त्याला खुराक किती दिला जातो, हे जे चौसष्ट कि.मी.च्या रेल्वे रुळावरून सत्ताधार्यांनी दाखवून दिलं ते आश्चर्यकारकच. अर्ध्या हळकुंडावर पिवळे झालेले लग्नाळु आजही रेल्वेचे स्वप्न पहात असले तरी नगर-बीड-परळी रेल्वेचा हनीमुन झाल्याचा देखावा जिल्हावासियांना दाखवण्यात आला तो दुर्दैवी. खरं तर काल
हळद रुसली
कुंकु हिरमुसलं
बीड जिल्ह्याच्या तीन पिढ्या बीडमध्ये रेल्वे यावी यासाठी हातात काकण बांधून हळद लावून बसल्या आहेत. आज ना उद्या रेल्वे येईल आणि बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावील, उद्योग धंद्यांना तेजी येईल, नवे उद्योग उभारले जातील, कच्च्या मालात वाहतूक खर्चाची बचत होईल आणि नवउद्योजक म्हणून तरणेताठे नावारुपाला येतील, परंतु दहा वर्षांच्या कालखंडात हळद लावून बसलेल्या बीडकरांना पुन्हा हळदीच्याच अंगाने बसावे लागत आहे. राज्य आणि केंद्र सरकार ही रेल्वे आणण्यासाठी प्रत्येक वर्षी बजेट देते. पन्नास-पन्नास टक्क्याचा भार सोसून हे दोन्ही सरकार बीडकरांचे स्वप्न साकार करण्याइरादे प्रयत्नशील आहेत. परंतु आजपावेत बीड जिल्ह्याचं स्वप्न पुर्णत्वास गेलेलं नाही. हळदीच्या अंगाने एखादी नवरी अथवा नवरदेव रेल्वेत बसल्यावरच लग्न करेल, असा हट्ट घेऊन बसला असता तर आज पावेत त्या नवरी अथवा नवरदेवाच्या समाधीवर गुडघ्या इतके गवत उगवले असते, हे सत्य नाकारता येणार नाही. उपकार त्या स्व. विलासराव देशमुखांचे त्यांनी जर केंद्र सरकारच्या हिस्स्यात अर्धा हिस्सा दिला नसता तर आजपावेत आष्टीतूनही रेल्वे धावली नसती. बीड जिल्हावासियांच्या स्वप्नाशी खेळणे, त्यांना स्वप्न दाखवणे, ‘मै हुँ ना’ चा रेल्वे मंत्र्यांना नारा द्यायला लावणे, रेल्वेत बसून दिल्लीला जाण्याचे स्वप्न पाहणे असे एक ना अनेक आश्वासने तीन पिढ्यांनी पाहितले. त्यात काल आष्टीतून नगरमध्ये रेल्वे धावली याचा आनंदोत्सव साजरा करणे, म्हणजे बीड जिल्ह्याची हळद रुसली आणि कुंकु हसल्याची गत आहे.
म्हातार्या नवर्याला
कुंकवाचा आधार
अशी मराठवाड्यात एक म्हण आहे. नवरा नसलेल्या बाईचे जिने जेवढे हलाखीचे असते तिथे म्हातारा का असायना परंतु नवरा आहे, तिच्या कपाळी भारदार कुंकू आहे. म्हणून तरी तिला समाजात मानापानाचे स्थान असते. तशीच परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वेबाबत बीड जिल्ह्याची आहे. विधानसभा निवडणूक येवो अथवा लोकसभेची निवडणूक येवो, नेतृत्व करणारा भ्रतार मीच रेल्वेच्या गळ्यात हार घालणार असे छातीठोकपणे सांगतो. हाबूक ठोकून आश्वासने देतो मात्र जसाच तो खासदार होतो तसा या रेल्वेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत राहतो. असा काहींचा आजपर्यंतचा इतिहास. मात्र स्व. गोपीनाथ मुंडे हे खासदार झाले आणि तेथून पुढे काही प्रमाणात रेल्वेला पैसे पडत राहिले. मात्र स्व. मुंडेंची उंची पाहता पहिल्या पाच वर्षांच्या कालखंडात हा रेल्वे मार्ग पुर्णत्वाकडे जायला पाहिजे होता मात्र तो गेला नाही आणि पुन्हा दुसर्यांदा जेव्हा स्व. मुंडे प्रचंड मतांनी विजयी झाले, देशाचे ग्रामविकास मंत्रालय त्यांच्याकडे आले, त्या कालखंडामध्ये हा रेल्वे मार्ग पुर्णत्वास गेला असता हा आमचा तर सोडा जिल्हावासियांचा आत्मविश्वास होता मात्र दुर्दैवाने मुंडेसाहेब ईही लोकी गेले आणि रेल्वेचा प्रश्न हा विधवा झाला. त्यानंतर त्यांच्या धाकट्या कन्या प्रितम मुंडे या खासदार झाल्या. या कालखंडात राज्यातल्या भाजप आणि देशातल्या भाजप सरकारने ज्या पद्धतीने नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला पैसे द्यायला हवे होते त्या पद्धतीने ते दिले गेले नाहीत. म्हणून हा प्रकल्प रखडत गेला अन् आज 64 कि.मी.च्या रुळावरून रेल्वे धावली म्हणून म्हातारा का असायना कुंकवाला आधार आहे हे मान्य करू. परंतु 64 कि..मी.च्या रेल्वेने आम्ही समाधानी नाहीत. या अर्ध्या हळकुंडावर आम्ही मुंडवळी बांधायलाही तयार नाही. आज बुलेट ट्रेनचा जमाना आहे आणि आम्ही आजही झुक झुक गाडीत बसण्याचे स्वप्न पाहतो. हा आमच्या स्वाभिमानावरचा आणि स्वप्नावरचा बलात्कारच नव्हे का! म्हणून आम्ही म्हणू, कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2024 पर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार म्हणून आश्वासीत केले असले तरी राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे, स्व. मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करणं ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून येत्या दोन वर्षात न्यू आष्टीत बसलेल्या किवा नगरमध्ये बसलेल्या प्रवाशांचे वैद्यनाथात दर्शन झाले पाहिजे. आता शंभर-दोनशे कोटींपेक्षा
हजारात बोला
कित्येक वर्षांपासून ऐकत आलो आहोत, नगर-बीड-परळी रेल्वेला पाच कोटी, शंभर कोटी, दोनशे कोटी आता बस झालं. माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात एखादा जिल्हा आजही रेल्वेचे स्वप्न पाहतो हा तिथल्या सत्ताधार्यांचा आणि देश चालवणार्यांचा अपमानच. त्यामुळे आता तरी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाबाबत उत्साह दाखवत राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने आणि केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या रेल्वे मार्गाला प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये प्रथम प्राधान्य द्यायला हवे. ‘राजा बोले दल हले’ असे सरकार देशात असताना बीडच्या रेल्वे बाबत सातत्याने साशंकता का निर्माण केली जाते? एखादा प्रकल्प तडीस न्यायचा असे तर त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. म्हणून आता नगरवरून थेट रेल्वे परळीलाच गेली पाहिजे. ही भूमिका लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्यांनी आता घ्यायला पाहिजे. आणि येणार्या अर्थसंकल्पात केेंद्र आणि राज्य सरकारने हजार-हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करत कुठल्याही स्थितीत ही रेल्वे 2024 पर्यंत परळीपर्यंत जाईल आणि या रुळावरून जिल्हावासियांना कधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी जगाचा कानाकोपरा दिसेल असे महत्वकांक्षी निर्णय घ्यावेत, एवढीच अपेक्षा आमची आणि जिल्हावसियांची आहे. राजकारण नक्की करा, तो तुमचा अधिकार आहे, स्वत:ची पाठ नक्की थोपटून घ्या, तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु रेल्वेसाठी हळद लावून बसलेल्या बीड जिल्ह्याच्या तीन पिढ्यांना रेल्वेची नवरी दोन-चार तुकड्यात वाटू नका.