बीड (रिपोर्टर)- पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकडे भाजपा संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपाने पूजा चव्हाणचा मुद्दा आक्रमकतेने मांडत असताना तिच्या वडिलांनी मात्र अनेक गंभीर आरोप केले आहेत. पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती असा गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी 2 वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे. पूजा प्रकरणात अनेक नावं येत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, हे सगळं चुकीचं आहे. कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत.