बीड (रिपोर्टर) सत्ताधारी मंत्र्यांनी नुकसान पाहण्यासाठी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी राजवाडे सोडून शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे, असे म्हणत संभाजी राजे यांनी आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या विशेष बाबीतून बीड जिल्ह्याच्या शेतकर्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा, अशी मागणी करत आज होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारकडून शेतकर्यांना मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
संभाजी राजे हे आज बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर काही शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातले आहे, तरी देखील अद्याप एकही मंत्री आणि बीडचे पालकमंत्री हे नुकसान पाहण्यासाठी बीड जिल्ह्यात आले नाहीत. यावर संभाजी राजेंना विचारले असता नुकसान पाहण्यासाठी त्यांनी यावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र मी राजवाडे सोडून शेतकर्यांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
यांची भेट घेऊन अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शेतकर्यांचे गेल्या दहा दिवसात प्रचंड नुकसान झाले. कापूस, सोयाबीन यासह इतर खरीप पिके पाण्यात गेली. दिवाळीचा सण तोंडावर असताना अतिरिक्त पावसाने धुमाकूळ घालून शेती उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हतबल झाला. अशावेळी शासनाने आता शेतकर्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना दिवाळीपूर्वी अॅडव्हान्स मदत जाहीर करावी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या विशेष बाबीतून बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली . दरम्यान क्रिकेटच्या निवडणुकीसाठी जसे सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्रित येतात त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, अशी मागणी माध्यमाशी बोलताना संभाजी राजे यांनी केली आहे. संभाजी राजे हे बीडनंतर लातूरच्या दौर्यावर जाणार आहेत.