पावसाचा तडाखा सुरुच; दिवाळीत दिवाळं
पंचनामे कसले करता, ओला दुष्काळ जाहीर करा
परळी, अंबाजोगाई पावसाने झोडपले
घाटनांदूर-हातोला रोडवरील रेणा नदीच्या पुलाचे नुकसान
काढलेलं सोयाबीन वाहून गेलं
कापूस पुर्णत: झोपला, आजच्या पावसानेही सर्वत्र हाहाकार उडवून दिला
दिवाळीत शेतकर्यांचं दिवाळं, बाजारपेठा शांत
व्यापार्यांचेही नुकसान
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून) काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस सुरू आहे. परळी, अंबाजोगाई तालुक्याला पावसाने झोडपले. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणच्या पुलांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. घाटनांदूर, हातोला रस्त्यावरील चंदनवाडी जवळ असलेल्या रेणा नदीवरील पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून काढलेले सोयाबीन अनेक ठिकाणी वाहून गेले तर कापूस पुर्णत: झोपल्याचे ठिकठिकारी दिसून येत आहे. भरदिवाळीत शेतकर्यांचं दिवाळं निघालं असून आज जिल्ह्यातील विविध भागात संततधार सुरू असल्याने शेतातले पिके पुर्णत: गेल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला आहे. मध्यंतरी दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कालपासून बीड जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. काल गुरुवार रोजी परळी, अंबाजोगाई, शिरूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. नद्या-नाल्यांना प्रचंड पुर आले. शेतातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याने अनेक ठिकाणी शेती खणून वाहून गेली. शेतातले उभे पीक अनेक ठिकाणी आडवे झाले. काढून ठेवलेले सोयाबीन अक्षरश: वाहून गेले. अंबाजोगाई तालुक्यात रात्री मोठा पाऊस झाला. त्यात शेतीची प्रचंड हानी झाली. आज पुन्हा पावसाने संततधार ठेवल्याने बीड जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आले आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांची शेती उद्ध्वस्त झाल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना थेट मदत देणे नितांत गरजेचे आहे. कुठलेही पंचनामे अथवा कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शासन-प्रशासन व्यवस्थेने वस्तूस्थिती मान्य करत बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होताना दिसून येत आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज गेवराई आणि बीडमधील नुकसानीची पाहणी करणार
अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकाचं अतोनात नुकसान झालं. राज्याचे कृषीमंत्री पिकांची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. आज दुपारी तीन वाजता गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील शेतीच्या पिकांची पाहणी केल्यानंतर बीड तालुक्यातील पारगाव जप्तीसह आदी भागातील पिकांची पाहणी ते करणार आहेत.