क्षीरसागरांच्या राजुरीसह पिंपळनेर,नाथापूर,चौसाळा, लिंबागणेश, म्हा.जवळा, माळापुरी, कुर्ला, येळंबघाट आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा
बीड (रिपोर्टर) बीडसह गेवराई विधानसभा निवडणूकीत होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून दाखवण्याची ताकद असलेल्या बीड तालुक्यातील होवू घातलेल्या 132 ग्रामपंचायतीपैकी बहुचर्चीत असलेल्या नवगण राजुरी, पिंपळनेर, नाथापूर, म्हाळसजवळा, येळंबघाट, कुर्ला, माळापूरी, चौसाळा, लिंबागणेश या नऊ मोठ्या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत असून त्यानिमित्ताने सदरची ग्रामपंचायत आपल्याच गटाकडे असावी. यासाठी बीड आणि गेवराई तालुक्यातील नेते प्रयत्नांची परिकाष्ट करत असून स्थानिक पातळीवर या नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीत रंगत भरल्याचे दिसून येत आहे. कुठे दुरंगी लढत तर कुठे तिरंगी,चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. त्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 132 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून यात प्रामुख्याने सर्वात मोठ्या आणि जिल्हाभरात बहुचर्चीत राहिलेल्या ग्रामपंचायतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर कायम दबदबा असलेल्या क्षीरसागर घराण्याच्या नवगण राजुरीत याच सत्रात निवडणूक होत असून चौसाळा, लिंबागणेश, पिंपळनेर, नाथापूर, येळंबघाट, म्हाळसजवळा, कुर्ला, माळापुरी या मोठ्या ग्रामपंचायतीसाठीही निवडणूका लागल्या आहेत. या नऊ ग्रामपंचायती बीड विधानसभा आणि गेवराई विधानसभा साठी महत्वपूर्ण आहेत. बीड तालुक्यात असलेल्या या ग्रामपंचायतीपैकी विधानसभेसाठी काही ग्रामपंचायतीचे मतदान हे गेवराई विधानसभेत होते. त्यामुळे या निवडणूकांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. नवगण राजुरीमध्ये ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी क्षीरसागरांच्या दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर गेल्या 25-30 वर्षापासून अविकासीत राहिलेल्या पिंपळनेरसाठी पाटीलबंधू यांच्यात लढत होत असतानाच जनता तिसर्या पर्यायाच्या शोधात असल्याने याठिकाणी तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे. तिकडे माजी जिल्हा परिषद सदस्य मदनराव चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या नाथापूर येथील ग्रामपंचायतसाठी चव्हाणांना आव्हान देण्यासाठी विरोधक एकवटल्याचे पहावयास मिळते. तर म्हाळसजवळा या ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांचे निर्वाधीत वर्चस्व आजपर्यंत पहावयास मिळाले. यावेळी मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी ज्ञानेश्वर खांडे हे मैदानात उतरणार असल्याने खांडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. येळंबघाट, कुर्ला, माळापूरी, चौसाळा आणि लिंबागणेश या ग्रामपंचायती विधानसभेसाठी महत्वपूर्ण असल्याने राजकीय नेत्यांनी या ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात याव्यात यासाठी प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होत असून त्यापूर्वी या बीड तालुक्यातल्या नऊ महत्वपूर्ण ग्रामपंचायतीसाठी सर्वच पक्षांनी ताकद लावायला सुरूवात केली आहे.