आश्चर्य : तीन दिवसात भरारी पथकाला एकही कॉपी सापडली नाही
जि.प.च्या सीईओंनी परीक्षा केंद्रांवर जाऊन केली बलभीम महाविद्यालय
केेंद्राची पाहणी; अनेक सेंटरमध्ये आतमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट
बीड (रिपोर्टर) कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाचे असले तरी कॉपीला मुक्ती मिळत नसल्याचे दिसून येऊ लागले. गेल्या तीन दिवसांपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी बैठे पथक, भरारी पथक नियुक्त करण्यात आले, असे असतानाही ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रांमध्ये आतून कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. आज जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी बलभीम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जावून पाहणी केली.
21 तारखेपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज परीक्षेचा तिसरा दिवस आहे. परीक्षेमध्ये कॉपी चालू नाही म्हणून गार्डींग ताईट करण्यात आली. महसूल, गटशिक्षण विभाग आणि पंचायत समितीचे पथक नियुक्त करण्यात आले. विशेष करून प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. असे असतानाही ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट दिसून येऊ लागला. आतून विद्यार्थी सर्रासपणे कॉप्या करू लागले. भरारी पथकाने विविध सेंटरवर जावून विद्यार्थ्यांची झाडाझडती घ्यायची आणि कॉपी करणार्या परीक्षार्थीवर कारवाई करायची, असा नियम असून आज तिसरा दिवस आहे तरीही एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी आज बलभीम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जावून तेथील पाहणी केली.
शिक्षणाधिकार्यांची नवगण महाविद्यालयाला भेट
प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शिंदे या दोन्ही शिक्षणाधिकार्यांनी संयुक्तरित्या येथील नवगण महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा केेंद्राला भेट दिली.
बारावीच्या परीक्षा तीन दिवसांपासून सुरु आहेत. आज मराठी विषयाचा पेपर आहे. माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही शिक्षणाधिकार्यांचे भरारी पथक तैनात असून त्यांनी आज शहरातील नवगण महाविद्यालय सेंटरला भेट दिली. परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने कोणताही गैरप्रकार नसल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्या भेटीमुळे गैरप्रकाराला आळा बसला असून यावर्षी सुरुवातीलाच शिक्षण विभागाने कॉपीवर निर्बंध घातले असून परीक्षा कालावधीमध्ये जर गैरप्रकार आढळून आला तर तेथील केंद्र संचालक, सहकेंद्र संचालक आणि वर्ग पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असल्यामुळे कदाचित या परीक्षा सुरळीत चालू असाव्यात.