परळी (रिपोर्टर) मी कायमच विकासाचे राजकारण केलेले आहे दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे राजकारण करणे योग्य नाही, असा टोला आ. धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.
परळी तालुक्यातील टोकवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या 4 कोटी 5 लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्याप्रसंगी श्री मुंडे बोलत होते. टोकवाडी हे गाव माझ्या राजकीय वाटचालीत कायमच माझ्या सोबतीला राहिले आहे. या गावाच्या विकासातील प्रत्येक वीट माझ्या हाताने लागते आहे याचा मला आनंद आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळी शहर बायपासचा टोकवाडी पासून पुढे जाणारा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. कोविडच्या कठीण काळामध्ये आम्ही सेवाधर्म पाळला, माझा प्रत्येक कार्यकर्ता कोविडला ढाल बनून सर्वसामान्यांच्या सेवेत उभा होता. जलजीवन मिशनचा डीपीआर देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झालेला आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या संकटात कधी उभे राहायचे नाही आणि फक्त न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करायचा, अशांनी श्रेय घेण्याचे राजकारण थांबवावे; असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. याप्रसंगी माजी आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास आ. धनंजय मुंडे यांच्यासह माजी आ. संजय भाऊ दौंड, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा.मधुकर आघाव, सूर्यभान नाना मुंडे, माऊली तात्या गडदे, पिंटू मुंडे, माऊली मुंडे, डॉ.राजाराम मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई मुंडे, उपसरपंच अनिल काळे, गोविंद फड, माधवराव मुंडे, अश्रूबा काळे, श्रीकांत फड, सौ. कल्पनाताई मुंडे, सौ. अलकाताई मुंडे, ग्रामसेविका श्रीमती रांजणकर यांसह आदी उपस्थित होते.