माता-भगिनींना पाण्यासाठी करावी लागते कसरत
बीड (रिपोर्टर) केंद्र सरकारच्या वतीने जलजीवन योजना राबविली जात आहे. बीड जिल्ह्यात जवळपास 1900 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महिलांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. या गावातील पाणीपुरवठ्या बाबत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालावे, अशी मागणी केली जाऊ लागली.
प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर शुद्ध पाणी मिळावे या दृष्टीकोनातून जलजीवन मिशन ही पाणी पुरवठ्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेअंतर्गत गावे, वाड्या, वस्ती, तांड्यावर पाणी पुरवठ्याची नेण्याचे काम केले जात आहे. काही गावांमध्ये एक ते तीन कोटी रुपयांपर्यंतचे इस्टीमेट बनविण्यात आले. बहुतांशी गावातील कामे पुर्ण झाले तर काही गावातील कामांबाबत प्रचंड प्रमाणात तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत. बीड जिल्ह्यात 1900 कोटी रुपयांची कामे सुरू असल्याची माहिती हाती आलेली आहे. दुसरीकडे आहेरवडगाव येथील शिंदे वस्तीवर पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. महिलांना दूरवरून विहिरीचे पाणी शेंदून आणावे लागते. हे विहिरीचे पाणी अत्यंत खराब असतानाही ते पाणी पिण्याची वेळ वस्तीवरील नागरिकांवर आली आहे. गावच्या ग्रामपंचायतीकडून वस्तीवरील नागरिकांना पाण्याचा पुरवठा का केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे. असे असताना प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करणे हे ग्रा.पं.चे कर्तव्य असतानाही बहुतांश सरपंच केवळ योजना लाटण्याचे काम करत आहे. शिंदे वस्तीवरील पाणीपुरवठ्या बाबत जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. दरम्यान शिंदे वस्तीवर पाण्याचा पुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी दिला आहे.