मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांची शेती उद्ध्वस्त केली आहे. अशा गंभीर स्थितीत शेतकर्यांना 50 हजाराची मदत द्यावी, यासाठी आपण स्वत:हून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगत अजित पवार भाजपात जाणार, असे ट्विट करणार्या अंजली दमानिया बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार?
अंजली दमानिया यांनी आज एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतशीर माहिती दिली. त्याच्या माहितीप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, तेही लवकरच! अशा आशयाच्या ट्विटवर पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्या सारख्या छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. मात्र दमानियांच्या ट्विटने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे पत्रकारांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकर्यांना मदतीची मोठी गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना किमान 50 हजार रुपयांची मदत द्यावी, यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.