काल रात्री वातावरणात बदल होउन सोसाट्याचा वारा आणि पावसाने थैमान घातले होते. यामध्ये विजेचे तांडव देखिल पहायला मिळाले तालुक्यातील पवारवाडी, खरात आडगाव, सादोळा येथे विज पडल्याने तिन शेतक-यांच्या सात बैलांचा मृत्यु झाल्याने या शेतक-यांवर संकट ओढावले असुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यांतुन होत आहे.
काल दिवसभर सकाळी उन पडल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दिवसभर उना नंतर सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान वातावरणात बदल झाला व अचानक वादळ वारा सुटला. थोडा पाउसही बरसला परंतु वा-यामध्ये विजेचे तांडव पहायला मिळाले. तालुक्यातील पवारवाडी, सादोळा, खरात आडगाव या तिन ठिकाणी विज पडल्याने पवारवाडी येथील शेतकरी चव्हाण सोमेश्वर सुदाम यांची एक बैलजोडी तर सादोळा येथील (पान 7 वर)
शेतकरी पवान सुभाष सोळंके यांचे शेतातील लिंबाच्या झाडाखाली असलेल्या दावणीस तिन बैलांवर पडलेल्या विजेने तिनही बैलांचा मृत्यु झाला आहे. खरात आडगाव येथील एक बैलजोडी असा एकुण सात बैलांचा मृत्यु झाल्याने या शेतक-यांचे चार ते पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महसुल विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित शेजळ यांनी भेट दिली आहे.
मायबाप शासनाने शेतक-यांकडे लक्ष द्यावे. निसर्गाच्या तडाख्यात सापडुन पशुधनाचे झालेले मृत्यु म्हणजे शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. फक्त पंचनामे करून विलंब न लावता मदत कशी देता येईल यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून बळीराजास दिलासा मिळेल.
– तुकाराम शिंदे, शेतकरी.