बीड (रिपोर्टर) राज्यात सर्वत्र गेल्या एक दीड महिन्यापूर्वी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्या झाल्या. बीड जिल्ह्यातील काही गावातून पुणे-मुंबई येथील पोलीस भरतीसाठी धरणग्रस्तांची काही बोगस प्रमाणपत्रे उमेदवारांनी दाखल केले आहेत. हे प्रमाणपत्रे खरे की खोटे याच्या पडताळणीसाठी मुंबई-पुणे येथील पोलीस आयुक्तालयाने बीड येथील पुनर्वसन अधिकार्याकडे पडताळणी अहवाल मागितला आहे.
पोलीस भरतीसाठी आपला नंबर लागावा म्हणून अनेकजण काहीही क्लृपत्या लढवतात. त्यातच मुंबई-पुणे येथील पोलीस भरतीसाठी बीड जिल्ह्यातील दोघा जणांनी धरणग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत. ज्यांच्या नावाने हे प्रमाणपत्र काढलेले आहेत ते धरणग्रस्त शेतकरी नाहीत. असा प्राथमिक अंदाज बीड येथील पुनर्वसन कार्यालयाने काढला आहे. मात्र याच्या खोलात जावून चौकशी करणे सुरू असून ज्या एक-दोन लोकांनी बनावट धरणग्रस्त प्रमाणपत्र काढले आहे अशांवर लवरच 420 चा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पुनर्वसन कार्यालयाच्या हालचाली चालू आहेत.