गौर बंजारा संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
बीड (रिपोर्टर)- शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. सदरील तरुणाचा खून झाला असून त्या प्रकरणातील तपास जलदगतीने करत आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसह अन्य चार मागण्यांसाठी गौर बंजारा संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी संदीप सोपान चव्हाण हा गेल्या काही दिवसांपूर्वी शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला होता मात्र तो घरी परतला नाही म्हणून शोध सुरू केला असता त्या तरुणाचा मृतदेह विठ्ठल लोंढे यांच्या शेतातील उसाच्या फडात मिळून आला. संदीप याचा खून झाल्याची शंका व्यक्त केल्यानंतरही अद्याप पोलिसांनी तपास करून गुन्हेगारांना अटक केली नाही. सदरचा प्रकार हा माणुसकीला काळीमा फासण्याचा असून या प्रकरणी 14 ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलीस दखल घेत नसल्याचे पाहून आज गौर बंजारा संघर्ष समितीच्या वतीने या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी व बंजारा व्हिजेए जातीचे बोगस प्रमाणपत्र देणार्या अधिकार्यावर कडक कारवाई करून बोगस प्रमाणपत्र देणार्या टोलीला जेरबंद करा, बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्यांना सरसगट मदत द्या, नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्या, सन 2020-21 चा विमा शेतकर्यांना विनाअट करून द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरू असून या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. सदरचे उपोषण हे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा. पी.टी. चव्हाण, आरबीपीचे पवन जाधव, अमर राठोड, अनिल राठोड, बी.एम. पवार, सुब पवार, जिवन राठोड, शरद चव्हाण यांच्यासह शेकडो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत.