कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या विकास कामांचे होणार उद्घाटन
परळी (रिपोर्टर): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत परळी येथे शासन आपल्यादारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याची स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. दोन डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारच्या वतीने सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार व कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थित घेण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचा कार्यक्रम वैद्यनाथ महाविद्यालयच्या समोरील मैदानावर होणार आहे. आजपर्यंत अनेक वेळा या कार्यक्रमाच्या तारखा घोषित करण्यात आल्या मात्र कोणत्या न कोणत्या कारणांनी त्या पुढे पुढे ढकलण्यात आल्या. आता मात्र या कार्यक्रमाची मैदानाची साफसफाई करुन मंडप, स्टेज उभारण्याची तयारी सुरू आहे. आंबेजोगाई परळी रस्त्यावर सिंचन भवन पासुन ईटके कॉर्नर पर्यंत स्वागत कमानी, वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्या रस्त्याची रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्रम लवकर म्हणजे 1 किंवा 2 डिसेंबर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच प्रशासनही तयारीला लागल्याचे दिसून येत असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी शुभारंभ
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच परळी शहरात येत आहेत. यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण व काही नवीन कामांचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी निधीमध्ये वाढ करुन 288 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून यासाठी तरतूदही केली आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थित होण्याची शक्यता आहे तर नगरपालिकेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ उद्यानाचे नुतनीकरण, डॉ भालचंद्र वाचनालय, विश्राम गृह पूर्ण झाले असून याचे लोकार्पण, बसस्थानकासाठी 28 कोटी रुपये मंजूर असून याचा पायाभरणी समारंभ आदि कामे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थित होणार असल्याची माहिती आहे.