बाजार पेठेतला रस्ता तात्काळ करा, स्ट्रीट लाईट बसवा, स्वच्छतेवर भर द्या, पिण्याचे स्वच्छ पाणी द्या यासह अनेक मागण्यांसाठी केले आंदोलन
शिरूर (रिपोर्टर): शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुझवण्यासह स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही कुठलीही जनउपयोगी कामे होत नसल्याचे पाहून आज संतप्त मनसे सैनिकांनी भररस्त्यावर लाकडे आणत त्याचे सरण रचून त्यावर झोपून आंदोलन करत शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरामध्ये विविध रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. अस्वच्छता आहे, वेळेत पाणीपुरवठा होत नाही, ते प्रश्न निकाली न निघल्यास मनसे यापुढे अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे तालुकाध्यक्ष सोपान मोरे यांनी दिला.
याबाबत अधिक असे की, शिरूर शहरातील विविध प्रश्नांसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष सोपान मोरे हे लढा देत आले आहेत. जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक हा बाजार पेठेतील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यासह अन्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ते बुझवण्यात यावेत, हा बाजारपेठेतील रस्ता नव्याने करून स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी, ज्या सुख-सुविधा उपलब्ध नाहीत त्या उपलब्ध कराव्यात, स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावेत, घनकचरा व्यवस्थापन करावे, आदी मागण्यांसाठी मनसे सैनिकांनी आज आगळेवेगळे आंदोलन केले. शहरातल्या मुख्य रस्त्यांवर लाकडे आणून सरण रचले व त्या सरणावर झोपून आपल्या वेगवेगळ्या मागण्या लावून धरत आंदोलन केले. वेळेत मनसेने केलेल्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा या वेळी मनसेकडून देण्यात आला.