2014 साली ‘काँग्रेसमुक्त’ भारताचा नारा देत अखंड देशावर भाजपाचाच ध्वज फडकवू इच्छिणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अमित शहा या जोडगोळीला 2019 पर्यंत प्रचंड प्रमाणात यश आले. 2019 च्या निवडणुकीत अघोरी बहुमत प्राप्त करून दिल्ली तक्तावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे सरकार भारत सरकार आहे, हे सरकार केंद्र सरकार आहे, हे सरकार संविधानाचं सरकार आहे, हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे याचा विसर पडला आणि त्यांनी थेट भारत सरकारचे नामकरण ‘मोदी सरकार’ म्हणून केले. ‘हम करे सो कायदा’, ‘आम्ही म्हणून तोच वायदा’ या हिटलरी वर्तनात मोदी-शहांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात देशात अक्षरश: जन की नव्हे तर केवळ आणि केवळ ‘मन की बात’ चालवली. मग या मन की बातमध्ये जणांचे प्रश्न सुटतात की, ते आणखी आ वासून मोठे होतात याचे देणेघेणे या दोन्ही जोडगोळीला नव्हतं.
आसुरी बहुमत
च्या बळावर आम्ही म्हणजेच देश आणि आम्ही म्हणजेच कायदा या भूमिकेत सरकार चालवल्याने आराजकता, तानाशाही, घमंट, राजनैतिकता, द्वेष, खोटारडेपणा, जुमलेबाजी, असंवेदनशीलता, धमकी, अविश्वास, पाखंड, अहंकार यापेक्षाही अन्य काही मोठमोठ्या द्वेषपुर्ण शब्दांना लाजवेल, असे कर्तृत्व या जोडगोळीने सातत्याने सुरू ठेवले. मग हे कर्तृत्व अजरामर करण्यासाठी कधी सीबीआयला हाताशी धरले, कधी ईडीला हाताशी धरले, गोदी मिडिया तर अक्षरश: मोदी-शहांच्या चरणचुंबापर्यंत येऊन पोहचली. यातही सक्सेस मिळाले नाही तर मग धर्म, जात, मंदिर, मस्जिद यावरून राजकारण करत देशातल्या बेरोजगारी, भूक, महागाई, शिक्षणाचे विकेंद्रीकरण, आरोग्याचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, महिलांची सुरक्षा, आरक्षणाची मागणी, शेतकर्यांचे आंदोलन यावरून लोकांचे लक्ष ‘जयश्रीराम’ व ‘अल्लाहू अकबर’च्या नार्याकडे नेऊन ठेवले. हे केवळ आसुरी बहुमतामुळे या जोडगोळीला करता आले. इथं कोण महिलांना नागवं करतं, तर कोण
शेतकर्याला वाहनाखाली चिरडतं
सत्तेच्या मदमस्तीत डवलत चाललेल्या मोदी-शहांच्या सरकारच्या नाकात जणू सत्तेची हवा अशी घुसली की, सत्तेतला प्रत्येक जण गावातल्या एखाद्या शेपूट वर करून उधळणार्या वळूसारखा जो तो उधळत राहिला. मग या वळुच्या पायाखाली कोण चिरडलं जातय, कोणाच्या शेतीपोतीचं नुकसान होतय तर उधळलेला वळू (पान 7 वर)
केव्हा कोणाला ढुसण्या मारतोय हे समजण्या पलिकडे होते. शेतकर्याचं आंदोलन महाप्रचंड झालं, कित्येक दिवस राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकर्यांनी आंदोलन सुरू ठेवलं. हे आंदोलन शेतकर्यांचं नाही तर दलालांचं आहे असे काही भाजपेयींनी म्हटलं. तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आंदोलनाला आंदोलनजीवी म्हणून हिणवलं. मुस्लिमांनी आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनालाही पंतप्रधान मोदींनी दाढी आणि टोपीच्या पोषाखावरून हिणवलं. मोदी विरुद्ध अथवा भाजप सरकार विरुद्ध जो कोणी उठेल त्यांना देशद्रोही ठरवलं. मात्र
पापाचा घडा भरतो
तसा योग 2024 च्या लोकसभेने देशवासियांना दिला. तत्पूर्वी देशातल्या प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षात फोडाफोडी करून इंग्रजांची भूमिका बजावत भाजपाने देशभरातल्या अनेक पक्षात दोन गट निर्माण करून 2024 च्या निवडणुकीत ‘चौर सौ पार’चा नारा दिला. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, पैशाचा महापूर आणि सत्तेचा पुरेपूर वापर करत भाजपाने पुन्हा एकदा आसुरी बहुमताने नरेंद्र मोदींना दिल्ली तक्तावर बसवायचे ठरवले. मात्र उधळलेल्या वळुला वेसन कशी घालायची आणि मस्तावलेल्या हत्तीचे गंडास्थळ कसे फोडायचे हे हिंदुस्तानवासियांना चांगले माहित होते. तसे देशवासियांनी मोदी-शहांचा चारसौ पारचा नारा प्रचारातच संपुष्टात आणला. सरशेवटी भाजपाला 240 जागांवर तर महायुतीला 293 जागेवर रोखून धरले. भारतीय जनता पार्टी आणि मोदी-शहांच्या विचाराच्या पापाचा घडा एवढा भरला की, प्रभू श्रीरामांनीही मोदींवर
‘हे राम’
म्हणण्याची वेळ आणली. महाराष्ट्रात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, देशातल्या अनेक राज्यात अनेक प्रादेशिक पक्षात फूट पाडली. शेतकर्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, जळत्या मणिपूरकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकर्यांच्या बी-बियाणांची किंमत प्रचंड वाढवली, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आगडोंब उसळून दिला, शिक्षणाचे तेच हाल, रेल्वे विकली, जिथे तिथे खासगीकरण, सर्वसामान्यांचे पदोपदी मरण आणि अदानी, अंबाणींचे भाजपेयींना वाटणारे पवित्रचरण पाहून साक्षात प्रभू रामांनाही मोदी-शहाचे मदमस्त सत्ताकेंद्र आवडले नसावे म्हणून कालच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला केवळ 48 टक्के मतदान दिले. नव्हे नव्हे तर प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अयोध्येत प्रभू रामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा म्हणजेच भाजपाचा उमेदवार पाडला. ‘राम नाम जपना, पराया माल अपना’ ‘मुँह मे राम बगल मे छुरी’ बाळगणार्या मोदी-शहांना प्रभू रामाचा हा फटकार. आता
कुबड्याच्या सहार्याची सत्ता
या देशात मोदींना चालवावी लागणार आहे. ‘हम करे सो कायदा’ आणि हुकुमशाहीच्या पद्धतीत असलेल्या मोदींना आता चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार या दोन मुरब्बी राजकारण्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे. आता मनमानीपणे शेतकर्यांना लाठी मारता येणार नाही, जळणार्या मणिपूरकडे दुर्लक्ष करता येणार नाही, सीबीआय, ईडीसारख्या आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करता येणार नाही, मनमानीपणे मुस्लिमांचे आरक्षण रद्द करता येणार नाही, कारण सत्ता स्थापने अगोदरच टीडीपी यांनी आंध्र प्रदेशातील मुस्लिमांच्या आरक्षणावर भाष्य केले आहे. आंध्र प्रदेशात मुस्लिमांचे आरक्षण सुरुच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असो मदमस्तीत कोणाशीही कुस्ती खेळलेल्या आणि हिटलरशाहीसाठी मिशांवर ताव देत हाबूक ठोकणार्या मोदींच्या सत्तास्थळाच्या गंडास्थळावर देशवासियांचा मताचा ठप्पा छप्पन इंचाची चाती 26 इंचावर नेऊन ठेवणारी आहे.