गणेश सावंत-
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावेर, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
- ग.दि. माडगुळकर
गदिमाची ही कविता आम्ही एवढ्यासाठीच देतोय, भुगोलाबरोबर इतिहास असलेल्या या अखंड भारत देशात आणि महाराष्ट्रात आज जे काही घडतय, ते खरच हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे म्हणण्यासारखे आहे का? महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या काही स्त्री अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या घटनांवर खरचं ही भूमी कर्तव्यदक्ष सीतारुघुत्तमाची म्हणावी का? इथे जर पराक्रमाची रामायणे घडली असतील, इथे जर छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास घडवताना तळपलेली तलवार घराघरात असेल तर इथे पुन्हा पुन्हा नराधमांच्या जनेंद्रियांचा क्रूर ताप का निरागसतेला होतोय? इथे जर पारतास गोध माधवाने केला असेल, इथे देशाने जर देशातल्या नागरिकाने गितेच्या दुधाचे अमृत पिले असेल तर मग सत्तेसाठी सत्य का लपवले जात आहेत? असे प्रश्न सध्याच्या व्यवस्थेवरून व्यवस्थेला विचारावीच लागतील. बदलापुरात जे काही प्रकरण घडलं, ते जेवढं संतापजनक तेवढेच त्या प्रकरणानंतर शाळेने घेतलेली भूमिका, संस्था चालकांनी घेतलेली भूमिका, लोकांनी घेतलेली भूमिका आणि राजकारण्यांनी घेतलेली भूमिका ही संतापजनक म्हणावी लागेल. होय, आम्ही पुन्हा एकदा लोकांनी घेतलेली भूमिका ही संतापजनकच म्हणतोय. त्याला कारणही तसच. एखादी घटना घडतेय, आमचा संताप उफळून येतो, आम्ही रस्त्यावर उतरतो, आत्ताची आत्ता फाशी द्या, कारवाई कराची मागणी करतो, कँडल लावून हात जोडतो अन् पुन्हा त्या कँडल खालचा म्हणण्यापेक्षा
‘दिव्या खालचा अंधार’
घेऊन घरी जातो आणि निपचीत निद्रिस्त होतो, अशाने हे राष्ट्र देवतांचे आणि प्रेषितांचे होणार का? इथे आचंद्र सुर्यनांदो, स्वतंत्र भारताचे म्हणता येणार आहे का? यासाठी तात्पुरत्या संतापाची आणि तात्पुरत्या मागण्यांची गरज नाही, इथे गरज आहे, नितीमत्तेची आणि इथे गरज आहे, सामाजिक एकतेची. मात्र आम्ही कधी जातीत विभागले जातो, कधी धर्मात विभागले जातोत, कधी पक्ष-संघटनेत विभागले जातो आणि तिथेच आमच्या मागण्यांचा, आमच्या सत्याचा आम्हीच बलात्कार करतो. वैचारीक मतभेद अथवा वैचारीक प्रौढता ही प्रत्येकाकडे असायला हवी आणि त्या वैचारीक प्रौढतेतून चांगल्यात चांगले विचार लोकांपर्यंत द्यायला हवेत, परंतु असे न होता कोणाची तरी बंदूक खांद्यावर ठेवायची आणि त्याला हवा तो निशाना लावून देण्यास आपण मदत करायची यातून हे राष्ट्र ना प्रेषितांचे होईल ना देवतांचे होईल. हे राष्ट्रतर आजमितीला बलात्कार्याचे आहे का? हा प्रश्न प्रत्येकाला संतापून पडत आहे अन् आम्ही
बलात्कारावर राजकारण
सर्रासपणे करत आहोत. ज्या बदलापूरच्या शाळेमध्ये बलात्काराची दुर्दैवी घटना घडते, चार ते सहा वर्षाच्या अजाणत्या मुलींवर बलात्कार केला जातो, या बलात्काराच्या घटनेने शाळेची बदनामी होईल म्हणून शाळा काही बोलत नाहीत, प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न होतो, जसे शाळेचे प्रशासन तसेच संस्थेचे चालकही निघतात. तेव्हा त्या बलात्कार्या नराधमांपेक्षा शाळा आणि संस्था चालकांनी केलेला हा आगाऊपणा भाडखाऊपणागत दिसून येतो. तुमच्या शाळेची बदनामी होईल म्हणून निरागस मुलींवर झालेला बलात्कार हे लोक दडवत असतील तर अशा बाजार बुणग्या मोठेपणाला काय जाळायचय? यातून आपलं राजकारण संपुष्टात येईल, आपलं नाव खराब होईल, असं जर त्या संस्था चालकाला वाटत असेल आणि त्यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर याला यथा राजा तथा प्रजा’ ज्या प्रमाणे म्हणतात ना त्या प्रमाणे त्या व्यक्तीचा पक्ष, त्या व्यक्तीची संघयना जेवढी जबाबदार तेवढीच सत्ताकारण करणारे राज्यातील सत्ताधी आणि देशातील सत्ताधीशही तेवढेच जबाबदार. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये अनेक राज्यात बलात्काराच्या घटना घडतायत, यात दस्तुरखुद्द बलात्कारी हे पक्षाचे पदाधिकारी किंवा त्यांचे आणि बलात्कार्याचे कुठले ना कुठले देणेघेणे दिसून आलेले आहे. आजपर्यतचा सत्ताधार्यांचा अनुभव पाहता हे लोक अजाणतेपणाने नव्हे तर जाणतेपणाने दोषींना पाठिशी घालून
याविरुद्धच्या संतापाला
सत्ताधारीच जर कुठे आंदोलनजीवी, कुठे देशद्रोही, कुठे खलिस्तानी तर कुठे तुकडे तुकडे गँग यापेक्षा शेलक्या विश्लेषांनी या आंदोलनाची अवहेलना करत असतील, आंदोलकांच्या भावना पायदळी तुडवित असतील तर घटना घडवणार्यांचे नक्कीच बळ वाढत जाते आणि या घटनांना जे लपवू पाहतात, त्यांचे तर अधिकतेने बळ वाढते. या आधी कित्येक आंदोलने झाली, त्यावेळी सत्ताधार्यांनी त्या आंदोलनांची अवहेलना केली. ज्यावेळी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्यांना देशद्रोही ठरवल जाते तेव्हा त्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार या नवनैतिकवाद्यांच्या मनात आला नाही. संगटनेच्या लिंंगपिसाट महिला पदाधिकार्यांविरोधात महिला पैलवान सर्वस्वपणास लावून रस्त्यावर आल्या, त्यावेळेसही सत्ताधार्यांच्या संवेदना जाग्या झाल्या नाही, आणि आता बदलापूर प्रकरणातही महिला पत्रकाराला ‘तुझ्यावर तर नाही ना झाला बलात्कार’ असे मस्तवालपणाने विचारणारा राजकीय नेता खरचं संवेदनशील आणि त्याचा पक्ष खरचं नैतिकवादी आहे का? हा प्रश्न नक्कीच या ठिकाणी उपस्थित होतो.
समाज भावना
लक्षात घेून खरंतर सत्ताधार्यांनी काम करायला हवं, मात्र सत्ताकारणासाठी निव्वळ राजकारण करणार्या आजकालच्या सत्ताधार्यांसह लोकप्रतिनिधींना केवळ निवडून यायचं, तेवढ्यासाठी ते वाटेल ते करतील, परंतु ज्यांच्यासाठी सरकार चालवायचं, त्यांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या न्याय-हक्काकडे, त्यांच्या आंदोलनाकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. याचा अनुभव अनेकदा प्रत्येकाला आला आहे. बलात्कारासारख्या घटनात जर राजकारण होत असेल, आंदोलकांना हिणवलं जात असेल, बलात्कारसारख्या घटनेतून उभारलेले आंदोलन हे राजकीय प्रेरित आहे असे म्हटलं जात असेल तर सत्ताधार्यांची किव येते, आणि केवळ या घटनाक्रमामुळे सत्ताधारी अडचणीत सापडले, त्यांच्या बुडाखालची खुर्ची काढून घेण्याची ही नामी संधी आहे, असे तर विरोधकांना वाटत असेल आणि त्यातून ते आंदोलन करत असतील तर हेही दुर्दैवी आहे. यातून पिडितेला न्याय मिळणार नाही आणि गुन्हेगाराला पुन्हा जैसे थे मिरवण्यासारखे वातावरण तयार होत राहील. तेवहे राष्ट्र देवतांचे आणि हे राष्ट्र प्रेषितांचे करावयाचे असेल तर बलात्कार्यांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जी शिक्षा होती ती शिक्षा झाली पाहिजे, हे राष्ट्र देवतांचे आणि प्रेषितांचे करायचे असेल तर कष्टकरी, कामगार आणि शेतकर्यांच्या घामाला तेवढेच महत्व आणि मोल दिले गेले पाहिजे, हे राष्ट्र देवतांचे आणि प्रेषितांचे करायचे असेल तर इथे डोनेशन विरहीत शिक्षण मिळाले पाहिजे. इथे आरोग्यसेवा तितकीच तत्पर असली पाहिजे, इथे सिंचनावर काम झाले पाहिजे, इथे पर्यावरणावर काम व्हायला पाहिजे तेव्हा हे राष्ट्र देवतांचे आणि प्रेषितांचे होईल.