
शिवसेनेने नगर पालिकेला बांधले मडक्याचे तोरण
न.प.समोर मडके फोडून पालिकेचा शिवसैनिकांनी केला धिक्कार
बीड, (रिपोर्टर)ः- बीड नगर पालिकेच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभारामुळे शहरवासियांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पाणी द्या, पाणी द्या असा अर्त टाहो जनता फोडत असतांना प्रशासन मात्र हातावर हात मांडून आहे. नगर पालिकेला जाग आणण्यासाठी आणि शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आज उबाठा गट शिवसेनेच्या वतीने न.प. कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. नगर पालिकेला मडक्याचे तोरण बांधून कार्यालयाच्या दारात मडके फोडून न.प.चा धिक्कार करण्यात आला. पाणी द्या पाणी द्या, लबाडांनो पाणी द्या यासह इतर घोषणांनी न.प.परिसर दणाणला होता.
नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात सध्या शहरवासियात संताप व्यक्त केला जात आहे. शहरवासियांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. आज शिवसेनेने लक्षवेधी आंदोलन केले. न.प.ला मडक्याचे तोरण बांधून कार्यालयासमोर मडके फोडून न.प.चा निषेध करण्यात आला आहे. न.प.च्याविरोधात शिवसैनिकांची प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. शहराला नियमित व आठ दिवसाला पाणी पुरवठा करण्यात यावा, शहरात पालिकेचे पाणी पुरवठा टँकर उपलब्ध करावे, अमृत पेयजल योजना रखडलेली आहे ती वेळेत पूर्ण करावी, जलप्राधिकरणाने वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून त्यांना तंबी देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज उबाठा गटाच्या वतीने करण्यात आल्या.हे आंदोलन जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी महिला जिल्हा आघाडीच्या मिराताई नवले, संजय महादौर, राजु महुवाले, मशरू पठाण, पंकज कुटे, सुशिल पिंगळे, मुकूंद पाटील, सतिष सालपे,गुजर, रवि वाघमारे, सचिन चंदनशिव, लोंढे निलेश, शामसुंदर जाधव, प्रतिक वाघमारे, दिलीप पवार, गणेश लोेणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
आठ दिवसाला पाणी पुरवठा होणार
काडी वडगाव जवळ चौदाशे मिटर जलवाहिनी गंजली
बीड शहराचा पाणी पुरवठा पूर्णतः विस्कळीत झाल्याने आज आ.संदीप क्षीरसागर यांनी काडी वडगाव या ठिकाणी जावून पाणी पुरवठ्याची पाहणी केली. काडी वडगाव परिसराजवळ मुख्य जलवाहिनी चौदाशे मिटर गंजली आहे. त्यामुळे 32 दिवसापासून पाण्याचा पुरवठा खंडीत झाला.आ.क्षीरसागरांनी 720 मिटर पाईप आ.निधीतून दिले.पाईप बदलण्यास आणखीन सहा दिवस लागतील. त्यानंतर आठ दिवसाला पाणी पुरवठा होईल असा विश्वास आ.क्षीरसागरांनी व्यक्त केला आहे.