बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल, मे या दरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ज्या ठिकाणी पाणी टंचाई होती तेथे टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता तर ज्या गावामध्ये इतर विहिरींना चांगले पाणी आहे. त्या विहिरी अधिगृहीत करून संबंधित गावकर्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या जुन महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. अवकाळी आणि मोसमी पाऊस धुवांधार झालेला आहे. भर पावसाळ्यात आजही जिल्ह्यातील 46 गावे आणि 58 वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच 162 विहिरी अधिगृहीत केलेल्या आहेत. त्या विहिरीवरून संबंधित गावकर्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गावात पाण्याची टंचाई जाणवते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडला तर टँकरची गरज भासत नाही. यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक होती. त्यामुळे पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन झाले होते. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने पाण्याच्या बाबतीत संकटाचे असतात. अनेक गावकर्यांना पाणी नव्हते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर व अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला. मे महिन्याच्या 6 तारखेपासून राज्यात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पाणी आले. अवकाळीनंतर काही प्रमाणात मोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली तरीही आज स्थितीमध्ये जिल्ह्यातील 46 गावे आणि 58 वाड्यां तहानलेल्या आहेत. या गावकर्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे तर 162 विहिरी अधिगृहीत केल्या होत्या. या विहिरीवरूनही संबंधित गावकर्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.