
न.प.कुणाकडे? जि.प. कोणासाठी? पं.स.चं काय करायचं?
लोकप्रतिनिधींसह वर्चस्ववादी नेत्यांची चाचपणी
बीड (रिपोर्टर): राज्याच्या राजकीय पटलावर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता लोकप्रतिनिधींसह वर्चस्ववादी नेत्यांकडून चाचपणी करण्यास सुुरुवात झाली आहे. न.प.कुणाकडे द्यायची, जि.प.साठी कुणाला निवडायचे, पंचायत समितीचे काय करायचे यासह पक्षीय युती-आघाडी आणि फोडाफोडीचे खलबत्ते कधी सुरू करायचे? नजर कुणाकडे ठेवायची? बाण कुणाकडे मारायचा? याची व्यूहरचना आणि चाचपणी बीडच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी स्व. गोपीनाथरावांपासून सर्वच नेत्यांनी प्रयत्नांची परिकाष्ठा केल्याचा इतिहास आहे. परंतु जेवढे स्व. गोपीनाथरावांना जमले तेवढे अन्य कुणालाच जमले नाही. परंतु आता राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यांतरे घडले. कालचे विरोधक आज युती आणि आघाडी करून राहिले. अशा स्थितीत मुंडे-धस-पंडित-सोळंके-आडसकर असोत की, अन्य लोकप्रतिनिधी, वर्चस्ववादी हे जि.प.वर अधिराज्य गाजविण्यासाठी आतापासूनच चाचपणी करताना दिसून येत आहेत. या वेळेस भाजपाच्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्रित आहे. त्यामुळे जिल्ह्यावर या युतीच्या नेत्यांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे. तिकडे शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करेल, आघाडीकडे खासदार सानेवणे आणि आ. संदीप क्षीरसागर हे लोकप्रतिनिधी आहेत. अन्य त्यांच्याकडे दुसरे राजकीय बळ पहायला मिळत नाही.
जि.प., पं.स.च्या आधी नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही आता युतीमधल्या कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या? यापेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील इच्छूकांपैकी नेमके कोणाकडे नगरपालिका द्यायची ? याची चाचपणी आघाडी आणि युतीचे नेते करताना दिसून येत आहेत. त्यामुळे इच्छूक आत्तापासून फिल्डींग लावू पहात असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत बीड जिल्ह्यात चर्चा सुरू असल्याचे दिसून येते.