
प्रकल्प जोत्याखाली ; मोठ्या पावसाची प्रतीक्षा
परळी (रिपोर्टर): मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली.जिल्ह्यात काही प्रकल्प जूनच्या सुरुवातीला तुडुंब भरले असताना मात्र परळी तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तालुक्यातील 3 लघु प्रकल्प अद्याप ही कोरडे असून परळी शहराला वरदान असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात 40 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
गेल्या मान्सून काळाच्या मानाने या वर्षी 15 दिवसात 10 टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील अनेक लघु आणि साठवण तलावांची आजची स्थिती चिंताजनक आहे.
परळी तालुक्यातील मुख्य जलस्रोत म्हणून नागापूर येथील वाण धरण अतिशय महत्त्वाचे आहे. परळी शहर व तालुक्यातील पंधरा गावासाठी नागापूर येथे वाण नदीच्या पात्रात धरण बांधण्यात आलेले आहे.मागील वर्षी पावसाळ्यात हे वाण मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते.मान्सुमपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने अनेक लघु व मध्य प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे तर काही प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. असे असताना देखील पावसाळाचा अर्धा जून महिना संपला असून या 15 दिवसात अत्यल्प पाऊस परळी तालुक्यात शासन दफ्तरी नोंद झालेली आहे. मागील वर्षीचा पावसाळ्यात जून च्या 15 दिवसात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या 15 टक्के म्हणजे 95 मिमी एवढा पासून झाला होता तर या वर्षी केवळ 5 टक्के 31 मिमी एवढाच पाऊस झालेला आहे. या सर्व परिस्थितीत नागापूर येथील वाण धरणात 40 टक्के पाणी साठा शिल्लक असून दमदार पाऊस जर झाला नाही तर परळी तालुक्यात मोठे जल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.परळी तालुक्यातील बोरणा-8 टक्के व बोधेगाव- 18 टक्के या मध्यम साठवण प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध आहे तर चांदापुर, कन्हेरवाडी,मोहा, मालेवाडी, गोपाळपूर, करेवाडी, दैठणा या लघु प्रकल्पात देखील अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे तर गुट्टेवाडी,खोडवा सावरगाव, कातकरवाडी हे लघु प्रकल्प अद्याप देखील ज्योत्याखाली आहेत.
येत्या काळात परळी तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास परळी शहरासह एकूणच तालुक्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून पशु आणि नागरिक यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे बनले असून प्रशासन व नागरिकांनी सध्या उपलब्ध असलेले पाणी नियोजन करून वापर करणे आवश्यक बनले आहे.