गणेश सावंत
मो. नं. 9422742810
अखंड हिंदूस्थानच्या राजकीय सारीपाटावर महाराष्ट्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. जेव्हा केव्हा हिमालयाला मदतीची गरज भासते तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री छातीचा कोट करून धावलेला असतो. हा इतिहास सुर्यप्रकाशाइतका सत्य असला तरी त्याच महाराष्ट्राच्या राजकारणाला फितुरी आणि लाचखोरीची लत लागलीय काय? हा प्रश्न गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडात घडू आणि घडवून येत असलेल्या राजकीय घटनाक्रमावरून दिसून येते. मग सत्ताकारणाचे गणित जुळवण्यासाठी तोडाफोडीचे राजकारण असो, अथवा खोक्याचे माणिक-मोती असो, महाराष्ट्राच्या राजकारणात दखलबाजांपेक्षा दगलबाजांना महत्व प्राप्त होताना प्रत्येक निवडणुकांमध्ये दिसून येते. दगलबाजी, फोडाफोडी आणि खोक्याच्या राजकारणावर स्वार झालेल्या भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने गफलतीचे आणि विश्वासघाताचे राजकारण मोठ्या प्रमाणे होते. म्हणून महाराष्ट्रातल्या निवडणुका खरच लोकशाहीच्या तत्वाला धरून होतात का? हा सवाल सातत्याने विचारण्यात येतो. गेल्या आठवड्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीचा निकाल बुद्धीजीवी, शिक्षीत मतदारांनी आपल्या मतातून जो दिला तो निकाल सत्तेसाठी ‘कुच्छ भी करेंगा’ या भूमिकेत असलेल्या भाजपाला धक्का देणारा ठरला. कोकण, अमरावती, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या विभागांमध्ये या निवडणुका झाल्या. या पाचही मतदारसंघामध्ये भाजपाचा अधिकृत उमेदवार पहायला मिळाला नाही. एकतर उसना किंवा उपर्या उमेदवारावर त्यांनी निवडणूक लढवून विजयाचा उन्मादी विक्रम करण्याचा मनसुबा आखला होता. मात्र शिक्षक मतदारांनी एकप्रकारे तो उधळून लावला. या निवडणुकीतले निकाल भाजपाबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही आत्मचिंतीत करावयास लावणारे म्हणावे लागतील. म्हणून तर नाशिकात
‘सत्याची जीत’
झाल्याचे म्हणावे लागेल. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी म्हणा, अथवा भाजपाचा तांब्याचा गळ म्हणा किवा तांबे कुटुंबियाची राजकीय महत्वाकांक्षा म्हणा परंतु या मतदारसंघातील सत्यजीत तांबे यांचा विजय हा काँग्रेस पक्षाला आत्मचिंतीत करून सोडणारा म्हणावा लागेल. जिते सत्यजीत तांबे काँग्रेसकडून उमेदवारी मागत होते तिथे त्यांचे वडिलांना काँग्रेस उमेदवारी देते, परंतु सत्यजीत तांबेंना उमेदवारी देत नाहीत. यातून काँग्रेसच्या महाराष्ट्र पक्षश्रेष्ठीला काय साध्य करायचे होते? हे देव जाणे परंतु सत्यजीत तांबेंनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला, त्याला भाजपाने पाठिंबा दिला आणि त्यात सत्यजीत तांबेंचा 20 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय झाला. सत्यजीत तांबे हे बहुचर्चीत आणि लोकाभिमूख नेते असताना काँग्रेसने त्यांना डावलणे आणि भाजपाने त्यांना स्वीकारत पाठिंबा देणे हे महाराष्ट्राच्या गचाळ राजकारणाचे सुत्र म्हणता येणार नाही का? निवडून आलेले तांबे अद्याप पावेत कुठल्याही पक्षात नसल्याचे सांगतात, तेव्हा भाजपाने आपला उमेदवार निवडून आला म्हणून पाठ थोपटून घेणे जेवढे अयोग्य तेवढेच तांबेंना पक्षाबाहेर ढकलत अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करणारे महाराष्ट्र काँग्रेसी दोषी. या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबेंचा विजय ही सत्याची जीत जेवढी मानली जाते तेवढाच या मतदारसंघात मुर्खपणाचा, सामंजस्याचा विक्रम नेमका कुणाचा? याचं उत्तर काँग्रेस किंवा भाजप यांना द्यावा लागेल. दुसरीकडे
विजयी अश्वावर आरुढ
असलेल्या भारतीय जनता पार्टीला आपल्या होम पिचवरही जय मिळाला नाही याचे विश्लेषण अथवा कारण भाजपाकडून सत्तेचा होत असलेला होणारा उन्माद तर नव्हे? नागपूर हे भाजपाचं माहेरघर मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे ना.गो. गाणार हे उमेदवार पराभूत झाले. जे नागपूर देवेंद्र फडणवीसांचे आहे, जे नागपूर संघाचे आहे, त्या नागपूरच्या बुद्धीजीवी शिक्षक पदवीधर मतदारांनी भाजपाला डावलणे म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व अमान्य करणे. मग हे नेतृत्व अमान्य करण्यामागचे कारण नेमके काय असेल? भाजपाी कार्यप्रणाली, देवेंद्र फडणवीसांची अघोरी महत्वकांक्षा, की बुद्धीजीवी मतदारांना कळून चुकलेली भाजपाची सत्ताप्रेरीत कार्यप्रणाली. असे एक ना अनेक कारणे यामागे असू शकतात. परंतु नागपूरच्या पराभवातून भारतीय जनता पार्टीकडून होत असलेल्या सत्ताकारणातील उन्मादाला तो ब्रेक असेल. जिथे निवडणुका तिथे भाजपाचे साम-दाम-दंडाचे राजकारण सर्वश्रूत आहे. परंतु आता बाजी पलटतेय काय? आणि वैचारिक मताची क्रांती घडतेय का? याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे म्हणावे लागेल. कोकण वगळता अन्य कुठल्याही मतदारसंघामध्ये भाजपाला यथोचीत यश न मिळणे म्हणजे पक्षाच्या विचारसरणीला बुद्धीजीवींनी नाकारणे, असेच म्हणावे लागेल. येथे औरंगाबादेतही जो
‘विक्रम’ झाला
तो उमेदवार विक्रम काळेंसाठी अनन्यसाधारणच. कारण काळे चौथ्यांदा या मतदारसंघातून विधान परिषदेवर जात आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली, भाजपाने शक्ती पणाला लावली, तोडाफोडीचे राजकारण झाले अन् विक्रम काळेंना पराभूत करण्याची खून गाठही बांधण्यात आली. परंतु इथे विक्रम काळेंचा विजयी रथ भारतीय जनता पार्टीला रोखता आला नाही. त्याचे एक ना अनेक कारणे असू शकतात. एकतर हा मतदारसंघ सुरुवातीपासून कुठल्याही पक्षाचा नव्हता. तो शिक्षक संघटनेचा होता. मात्र गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीने आपले अधिराज्य काबिज करून सोडले आहे. भाजपाने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या संस्थानिकांसह अन्य संस्थानिकांच्या मदतीने विक्रम काळेंचा पराभव करणे ठरवले होते मात्र भाजपाच्या या संधीसाधू वृत्तीला मतदार भुलले नाही, आणि विक्रम काळेंचा निर्विवादीत विजय झाला. परंतु या निवडणुकीत एक विषय लक्षवेधक आणि राष्ट्रवादीसह या मतदारसंघावर अधिराज्य गाजवू पाहण्याचे स्वप्न पाहणार्यांना आत्मचिंतीत करावयास लावणारा ठरला तो म्हणजे विक्रम काळेंचा विजय आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तीन नंबरवर गेला. मग या ठिकाणी दुसर्या क्रमांकावर कोण आलं? त्याची चर्चाही साधी करण्यात आली नाही. तर या मतदारसंघात
दुसर्या क्रमांकावर शिक्षक संघटना
चे उमेदवार पहावयास मिळाले. विश्वासराव देशमुख म्हणून जे उमेदवार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरले होते त्यांना भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान झाले. याचाच अर्थ मराठवाड्यातील पदवीधर आणि शिक्षक हे राजकीय हत्तक्षेपाला कंटाळले. भारतीय जनता पार्टी असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे असोत या दोघांची कार्यप्रणाली मतदारांना भावली नाही म्हणून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी विक्रम काळेंचा विजयी आकडा आटोक्यात अर्ध्यावर आला. इथं दखलपात्र विश्वासराव देशमुखांना महत्वाच्या तराजूमध्ये पहायला हवं. आकड्यात विक्रम काळेंचा विजय झालेला असला तरी विश्वासात विक्रम काळेंचा हा पराभव नव्हे काय? याचं आत्मचिंतन या निकालाच्या माध्यमातून विक्रम काळेंनी नक्कीच करायला हवा. महाराष्ट्रातल्या या पाच मतदारसंघामध्ये ज्या काही निवणुका झाल्या आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातून जे काही विक्रम नोंदवले गेले त्या विक्रमांनी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना आत्मचिंतीत होण्याची संधी नक्कीच दिली. मात्र ज्यांनी
संधीचं सोनं
करण्याचा इरादा अखला त्या लोकांच्या हातीही काळा कोळसाच लागला. याचं ज्वलंत उदाहरण म्हणून आपण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांकडे पाहू. काल झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाशी सलगी करत असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचा पराभव होण्याहेतू भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या पाठिंब्यातून उमेदवाराचा विजय होईल आणि भाजपामध्ये आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल, असे नक्कीच क्षीरसागरांना वाटले असेल. परंतु कित्येक शाळा, महाविद्यालये आणि पदवीधरांची नोंद असणार्या क्षीरसागरांचा पाठिंबा हा भाजपा उमेदवारासाठी फोल ठरला अन् तिथं भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीमध्ये जसे देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय दुरावा अधिक स्पष्टतेने दिसून आला तशी देवेंद्र फडणवीसांची आणि जयदत्त क्षीरसागरांची अधिक जवळीक प्रकर्षाने पहावयास मिळाली. या निवडणुकीमध्ये अनेक विक्रमे झाले आणि त्यातून कुणाला यश कुणाला अपयश मिळालं असलं तरी आजमितीला मतदार हा जागरुक होत चालला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सत्ता केेंद्राची पेरणी करण्याऐवजी लोकविश्वासाची पेरणी करणे अधिक महत्वाचे ठरेल.