गणेश सावंत
महाराष्ट्रात राजकारणासह समाजकारणामध्ये भूमिकेला अनन्यासाधारण महत्व आहे. विचाराला मोठा आयाम आहे. मात्र त्याच महाराष्ट्रात भूमिका आणि विचाराचे अक्षरश: वस्त्रहरण झाल्याचे या पंचवार्षिकमध्ये पहायला मिळाले. स्वातंत्र्यपूर्व कार्यकाळापासून भूमिकेला महत्व असल्याचे महात्मा गांधींच्या अहिंसेतून सुभाषचंद्र बोसांसह भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या क्रांतीतून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सवर्ण विरुद्ध क्षुद्रांच्या लढ्यातून पहायला मिळालं आहे. या तिन्ही भूमिका वेगवेगळ्या असल्या, त्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरीही अंतिम स्थळ हे स्वातंत्र्याचे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचं साधन मिळवून देण्याचं होतं. आज त्याच महाराष्ट्रात भूमिकेला अथवा विचाराला थारा नाही. आज मतदारांनी आपल्या भूमिकेतून आणि एखाद्या पक्षाच्या विचाराला प्रभावीत होऊन मतदान केले तर ती भूमिका आणि तो विचार पाच वर्षे निवडून दिलेला उमेदवार सोबत ठेवील, असे शपथेवर सांगणे कठीण होऊन बसले आहे. कुठला आमदार, खासदार केव्हा कुठल्या पक्षात जाईल अन् विचार आणि भूमिका वेशीवर टांगेल हे सांगणे कठीण आहे. अशा लोकांचे पाय पवित्र अन् डोकं विचित्र असतं तेच महाराष्ट्राचे चित्र होऊन बसलय.
भूमिका ही विचाराला महत्व देत गेल्या 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी आपआपल्या विचाराच्या लोकांना मतदान केले. आपल्याला आवडणार्या भूमिकेवर मताची मोहर उमटली मात्र सत्तापिपासूंनी महाराष्ट्रातल्या मतदारांची अवहेलना केली. अभद्र युत्या झाल्या, आणि गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या विधानसभेत एक नव्हे दोन नव्हे तीन वेळा मुख्यमंत्र्याला शपथ घ्यावी लागली. खरंतर गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्य हाकलं जात होतं की त्या विधानसभेत स्वपक्षाचं ऑफीस भाजपानं थाटलं होतं ? हेच महाराष्ट्राच्या जनतेला उमजत नव्हतं. ज्या भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने 26 वर्षे गळ्यात गळे घालून आपली भूमिका, आपले विचार महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रुजवले त्याच भाजपापासून शिवसेना 2019 ला बाजुला झाली आणि आयुष्यभर ज्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या-शाप द्यायची त्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. भाजप आणि शिवसेनेचा जो विचार, जी भूमिका एकसंघ होती ती भूमिका ठाकरेंनी बदलली खरी मात्र ती बदलावी अशी परिस्थिती एकअंगी हुकुम गाजवू पाहणार्या भाजपाच्या बदललेल्या विचारसरणीमुळे. हेह नाकारता येणार नाही. इथूनच
विचार आणि भूमिकेचे वस्त्रहरण
होत राहिले. महाराष्ट्रात जे काही पक्ष आहेत, मग काँग्रेस, राष्ट्रवाद काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेकाप, वंचीत यासह अन्य विचारधारांचे पक्ष महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांना आणि क्रांतीकार्यांना आपले आयडॉल समजून मते मागत आले आहेत. या महाराष्ट्रामध्ये भूमिकेला मोठे महत्व आहे. ज्याप्रमाणे गांधींनी अहिंसा सोडली नाही, भगतसिंहांनी क्रांती करणं सोडलं नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्षुद्रांसाठी लढणं सोडलं नाही, लोकमान्य टिळक आपल्या भूमिकेवर ठाम राहायचे, नव्हे नव्हे तर प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत पत्रकारिता करणारे पत्रकार आपली भूमिका आणि विचार सांभाळून ठेवत राष्ट्रहिताचे आणि जनहिताचे भाष्य करायचे. परंतु गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात त्याच विचारांना आणि त्याच भूमिकेला सत्ताकारणासाठी सताडपणे कुणाच्या ना कुणाच्या सेजेवर निजवण्यात आले हे दुर्दैव. भाजपापासून शिवसेना लांब झाली आणि तिने सत्तास्थापन केले हे जे वर्मी लागलेले दु:ख भाजपाला अस्वस्थ करत गेले आणि इथेच महाराष्ट्रामध्ये
व्याभिचाराचे राजकारण
सुरू झाले. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं हा दाखला देत आता राजकारणातही सर्वकाही क्षम्य असल्याचे सांगत ठाकरेंच्या शपथविधी आधीच राष्ट्रवादी फोडून देवेंद्र फडणविसांनी पहाटेचा शपथविधी केला. मात्र तो सहा तासही तगला नाही. अखेर फडणविसांना राजीनामा द्यावा लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर आपल्या विचाराला आणि भूमिकेला हरताळ फासत ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा दोन-अडीच वर्षाचा कार्यकाळ परिपूर्ण झाला अन् शिवसेना फुटली गेली. नव्हे नव्हे तर ती भाजपाने फोडली. शिवसेनेचे एकपाथ शिंदेंसह चाळीस-बेचाळीस आमदार, काही खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. ते केवळ ठाकरेंनी राष्ट्रवादीशी सुत जुळवले, शरद पवार-अजित पवारांशी मनोमिलन केले म्हणून, असे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चमुकडून सांगितले जाऊ लागले. ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला अन् महाराष्ट्राला तिसर्यांदा शपथविधी घेण्याची वेळ आली. तो शपथविधी एकनाथ शिंदेंचा झाला. पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली अन् अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक आमदार, खासदार भाजपाच्या गोटात येऊन बसले. आता फुटलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे विचार कोणते, त्यांची भूमिका कोणती? यावर प्रश्न उपस्थित होत असताना हे सर्व फोडाफोडीचे राजकारण करणार्या, स्वत:ला संस्कारशील समजणार्या भाजपाची भूमिका ती कुठली? हे प्रश्न आणि त्यावरचे उत्तर अद्याप महाराष्ट्राला मिळालेच नाही.
पाय पवित्र आणि डोके विचित्र
असणार्या भाजपाने केवळ सत्ताकारणाचं गणित कसं जुळवता येईल? एवढच पाहिलं. मग त्यांनी महाराष्ट्राने प्रशिक्षीत केलेल्या राजकीय विचारांकडे पाहिलं नाही, राजकीय भूमिकेकडे पाहिलं नाही, पाहिलं त्यांनी केवळ आणि केवळ सत्ताकारणाची उब. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं, त्या राजकारणामधून महाराष्ट्रात विकास नावाचं पोर जन्माला आलं की नाही? हे सांगणे कठीण असले तरी शेतकर्यांच्या आत्महत्या, आरक्षणाचा लढा आणि त्या लढयाच्या निमित्ताने सरकारकडून मागणी पुर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्या, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, दुष्काळी स्थितीवर उपाययोजनेबाबत राज्य सरकारचा कमकुवतपणा, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस याचे गगनाला भिडलेले भाव हे सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत. केवळ सत्ताकारणाचं गणित जुळवतांना राज्यात आणि केंद्रात सत्ता काबीज करून राहिलेल्या भाजपाला बाकीचे हे प्रश्न पाच वर्षांच्या कालखंडात उमजलेच नाहीत. आता पुन्हा
लोकशाहीचा उत्सव
सुरू झाला आहे. पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांसाठी आज सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुकाही येतील. आज मितीला महाराष्ट्रातील जनतेने विचारावर, भूमिकेवर मतदान केलेले असेल, आता तरी राज्यातल्या पक्षांनी भूमिकेशी, विचाराशी इमान बाळगावा. या पंचवार्षिकमध्ये तरी फोडाफोडीचे राजकारण न होता राज्याच्या विकासाचे राजकारण, भूमिका आणि विचारातून होईल, आणि महाराष्ट्रात जे पायपवित्र डोकं विचित्र हे महाराष्ट्रातलं चित्र बदलून जाईल, अशी अपेक्षा.