गणेश सावंत
आजच्या दिवसाला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, आदिवास्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे, आजचाच तो दिवस इ.स. 1800 मध्ये आदिवासींच्या पाड्यात एका बंडखोराचा जन्म झाला. त्यांचे नाव बिरसा मुंडा होते. जिथे न्याय काय असतो, अन्याय काय असतो, हे माहित नव्हते. आपलं जीवन फक्त अन्याय सहन करण्यासाठी आणि किड्या-मुंग्यागत जीवन जगत मरण्यासाठीच आहे, एवढेच आदिवासी समाजाला माहित होते, मात्र तेव्हा बिरसा मुंडा यांच्यात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होत गेली. इंग्रज आदीवासीयांना टाचेखाली चिरडताना पाहून बिरसा मुंडांच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती. हाताच्या मुठी वळल्या जात होत्या, ओठ दाताखाली कचकण चावत मस्तकावरच्या आट्या अन्याय करणार्या इंग्रजांच्या नरडीचा घोट घे, सांगत होत्या. म्हणूनच बिरसा मुंडांनी किड्या मुंग्यागत जगण्यापेक्षा बंड करून निधड्या छातीने मरणे पसंत करत त्या काळी इंग्रजांविरोधात बंड पुकारले. उलगुलाणचा नारा देत इंग्रजांविरोधात दोनहात केले, म्हणूनच बिरसा मुंडा हे आदिवासीयांचे पहिले नेते झाले. लढवय्ये योद्धा होत आज त्यांच्याच जयंतीदिनी आम्ही आत्महत्या करणार्यांना या कटाक्षातून आवाहन करतो.
जीव जातीचा नाही,
माणसाचा जातो
गेल्या काही वर्षापासून आम्ही पाहतोय, आत्महत्या सारखी अविचारी-अविवेकी झिंग नैराश्यात आलेल्या बालकापासून तरुणापर्यंत ते वृद्धांपर्यंत चढलीय, त्यातून काहीही झालं की, टेन्शन आलं म्हणत आजची पोरं आत्महत्या करतायत. मराठा आरक्षणाचं आंदोलन गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात दीडशेपेक्षा अधिक मराठ्यांच्या पोरांनी आरक्षण मिळत नाही, म्हणून आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारला. तो दुर्दैवीच. ते मराठ्यांची पोरं आत्महत्या करतायत तसे गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात आपला नेता निवडणुकीत पराभूत झाला म्हणून वंजारा समाजातील तरुण बांधवांनी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग स्वीकारलाय. बंधुंनो, आत्महत्या हा नेभळटांचा मार्ग आहे. आलेल्या संकटांशी सामना करणे आणि संघर्ष करत त्यावर विजय मिळवणे हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे. इथं आत्महत्या करणारा कोणच्या जातीचा यापेक्षा आत्महत्या करणारा हा मानव जातीचा आहे. जी मानव जात धैर्य ठेवून सातत्याने संघर्ष करत यशाची पताका फडकावते त्या माणूस जातीत तुमचा आमचा जन्म झालाय. त्याने असे संघर्षापासून पळता कामा नये. जगद्गुरू संत तुकोबा तर आत्महत्या करणार्यांना
‘मरण मागे गाढवाचा बाळ’
असे म्हणून हिणवतायत. तुकोबा म्हणतायत,
न लगे देवा जीव सहजीची जाणार
आहे तो विचार जाना काही
मरण जो मागे गाढवाचा बाळ
बोली जे चांडाळ शुद्ध त्याशी
तुका म्हणे काही घडील
निधान जोथित टाकू पाहे
जगद्गुरू संत तुकोबा या अभंगातून म्हणतायत, जीव देऊ नये तसा तो निसर्गात जाणारच आहे, हे समजून घ्यावं. जो मरण मागतो तो गाढवाचा बाळ समजावा, तो अतिशय नेभळट समजावा, आपल्या जवळ असलेला जीवनाचा ठेवा जो टाकू पाहत असेल, तो स्वत:चं हित ते काय साधणार? एका जयाने अथवा एका पराजयाने कोणी जर आत्महत्या करत असेल, तर त्यांनी छत्रपती शिवरायांचा
पुंदरचा तह
पहावा, वाचावा अन् गड-किल्ल्यावर जावून तो अनुभवावा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मुघलांच्या सैन्यांनी घेरलं तेव्हा महाराजाचीं शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, आपण मुघलांच्या अफाट सैन्याशी मुकाबला करू शकणार नाहीत, अपाण जे कमावलं ते सर्व गमावून बसणार आहोत, तेव्हा आता आपण काही काळ माघार घेणं योग्य आहे, असा विचार करून महाराजांनी राजा जयसिंहांसोबत तह करण्याचे ठरवले. मिर्झाराजे जयसिंह आणि महाराजांमध्ये पुरंदरच्या गडावर तह झाला. 23 किल्ले आणि चार लक्ष होणाचा प्रदेश मिर्झा राजांकडे सुपूर्द करण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळी शंभूराजांनाही मिर्झा राजांकडे देण्यात आले. विचार करा, स्वराज्य उभं करण्यात आलं होतं आणि त्या स्वराज्यावर मुघल चालून आले होते. अशा स्थितीत 23 किल्ले दिले, आपल्या तळहाताच्या फोडाला म्हणजेच शंभुराजांना मुघलांच्या छावणीत पाठवलं, तेव्हा राजेंना काय वाटलं असेल. त्यांचा जीव काय म्हणत असेल. मात्र ती राजकीय खेळी होती, महाराज निराश झाले नाही, उलट महाराजांनी गनिमी कावा करत ते 23 किल्ले तर घेतलेच त्यापेक्षा साडेतीनशे किल्ल्यांचं स्वराज्य उभं केलं. त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तुमचा जन्म झालाय, मग एका जयाने अथवा एका पराजयाने तुम्हाला नैराश्य का येते? शेतकरी असो की, अन्य कुणी असो, आरक्षणाचा प्रश्न असो की निवडणुकीत पराभूत झाल्याचा विषय असो, त्याठिकाणी
“नायमात्मा बलहीनेन लभ्य”
सारखी स्थिती निर्माण होतेय. त्या स्थितीत आत्मविश्वास, आत्मबल, आत्मगौरव, आत्मप्रेरणा या दिव्य संजीवक तत्वांची ओळख आपल्याला करून घेणे नितांत गरजेचं असतं आणि ही ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात संत तुकाराम महाराज ते संत भगवानबाबा यांच्या विचारात नव्हे नव्हे तर संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून विदोप निशेदातील प्रत्येक पानात आत्मबळ पुरवणारं जीवनदायी रसायन मिळेल. मात्र संतांचे विचार, महापुरुषांचे कर्तृत्व वाचायला आणि समजून घ्यायला वेळ कुणाला आहे. मित्रांनो, तुम्ही आत्महत्या करून मोकळा होताय, मात्र तुमच्या पाठीशी असलेल्या आई-वडिलांचं, लेकरा-बाळांचं भविष्य काय? याचा विचार करत चला. आत्महत्येचा विचार ज्याच्या मनात येतो त्याच्यापासून ते समाजात वावरणार्या प्रत्येकांना आमचे आवाहन आहे, ‘जीव जातीचा नाही, माणसाचा जात असतो’ त्यामुळे या नैराश्येतील विषयाविरोधात उठायला हवं, उभं राहत उलगुलाण पुकारायला हवा.