गणेश सावंत
भाजपाच्या विरोधातला असंतोष, भाजपाच्या कटकारस्थानाचा रोष अन् भाजपाच्याच अनैतिक अधिकार वापर यामुळे बॅकफुटवर गेलेल्या महायुतीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. जनतेच्या दारात अक्षरश: भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कर्तृत्वाचा महामेरू कस्पटागत उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता शिंदे आणि अजित पवारांची खैर नाही, शिंदेंना तरी त्यांचे खासदार निवडून आणता आले मात्र अजित पवार संपले. असे काहीसे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. परंतु विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत शिंदे-अजित पवारांचे आमदार फुटतील, असा जो समज ठाकरे आणि शरद पवारांचा होऊन बसला होता. त्याला फडणवीस-शिंदे-अजित पवारांनी अभेदतेचा नारा विधान परिषदेच्या निकालात दिला. कालच्या निकालातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवारांनी दाखवून दिले. काल जनतेच्या दारात आमचा फाटका पदर होता परंतु आमदाराच्या घरात आमची मखमलीच शाल आहे.
देशाच्या राजकीय सारीपाटावर महाराष्ट्राचं राजकारण हे सातत्याने चर्चेत असतं. महाराष्ट्र हा वैचारिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय आहे. इथे नेतृत्व काय करतय, यापेक्षा महाराष्ट्राला काय हवय, याची जाण असणारा मतदार आहे. त्यामुळे सत्तेची मदमस्ती केली, की त्याची मस्ती महाराष्ट्र उतरवतोच. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात कुठल्या राज्यात झाले नाही, असे अभद्र राजकारण महाराष्ट्रात झाले. कोण केव्हा कोणासोबत जाईल आणि सरकार स्थापन करील, हे गेल्या वर्षभरापूर्वीपर्यंतही सांगता येत नव्हते. पाच वर्षांच्या कालखंडात तीन वेळेस मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. भाजपाने जी कुटनिती, अधिकाराचा गैरवापर, ब्लॅकेमेलिंग यासह सरकार स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण केले ते महाराष्ट्राला नक्कीच आवडले नाही आणि यातून शरद पवार, उद्धवी ठाकरे यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे खासदार सर्वाधिक निवडून आले. अशा वेळी पक्ष फोडूएन भाजपाशी संलग्न झालेले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे भवितव्य काय? यावर चर्चा होत राहिली. अजित पवारांचे राजकीय करिअर संपुष्टात आले, असेही म्हटले जाऊ लागले. मात्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा अजित पवार, एकनाथ शिंदेंचे
आमदार फुटणार
असे महाविकास आघाडीला वाटू लागले. राजकारणातला तेल लावलेला पहिलवान म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं ते कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत झाल्यामुळे अजित पवारांचे आमदार आपल्याला मदत करतील, एकनाथ शिंदेंचे काही आमदार आपल्या सोबत राहतील, असा आत्मविश्वास बाळगत महाविकास आघाडीकडून शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु निकालात उलटे झाले, ठाकरे-शरद पवारांचा आत्मविश्वास फाजिल ठरला अन् महायुतीच्या त्रिमुर्तींनी महायुती अभेद असल्याचा संदेश उभ्या महाराष्ट्रासह दिल्ली तख्ताला दिला. कालची निवडणूक ही फडणवीस-शिंदे आणि अजित पवारांसाठी महत्वपुर्ण मानली जात होती. इथे विस्कुट झाले असते अन् फडणवीस-शिंदे-पवारांचे आमदार फुटले असते तर त्याचा इफेक्ट येणार्या विधानसभा निवडणुकीवर नक्कीच पहायला मिळाला असता,
महाराष्ट्राचा कौल
कुणाकडे असणार? हे आत्ता सांगणे कठीण असले तरी लोकसभेतील वातावरण आणि राज्यातलं आत्ताचं धगधगतं वातावरण कुठल्याही पक्षाला एक चूक हात पोळून घेणारं आहे. अशा स्थितीत आपल्या आमदारांना यशाची माळ घालून बसलेल्या महाविकास आघाडीकडे न जाऊ देता आपल्याकडेच ठेवणे हे जिक्रीचे ते काम फडणवीस-शिंदे आणि धाकल्या पवारांनी चांगले केले. विधान परिषदेमध्ये भाजपाचे पाच, शिंदेंचे दोन आणि धाकल्या पवारांचे दोन आमदार निवडून आले. ज्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे आमदार फुटीकडे लक्ष वेधले जात होते ते अभेद राहिले. परंतु
महाविकास आघाडीचे
आमदार फुटले
प्रामुख्याने त्यामध्ये काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचे सांगण्यात येते. ठाकरे गटाचे आमदारही फुटल्याचे बोलले जात असून दस्तुरखुद्द शरद पवार गटाचा आमदारही फुटल्याची चर्चा आहे. जिथे यश पदरी असताना नरकडी होते त्या महाविकास आघाडीचे भविष्य ते काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. काँग्रेसचे आमदार फुटणे याची कॉलर आणि झालर ही माजी मुख्यमंत्री तथा नुकतेच भाजपात डेरेदाखल झालेले अशोक चव्हाण यांची असावी. तेव्हा चव्हाणांसोबत काही आमदार जाणार, असे बोलले जात होते तेव्हा ते न जाता आत्ता विधान परिषद निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांच्या त्या आमदारांनी काम दाखवलं अन् ठाकरे-पवारांच्या लोकसभा विजयातील अश्वाला त्यांनी रोखलं. कालच्या निवडणुकीतून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे
भाजपाला फक्त
जनताच रोखू शकते
शासन आणि प्रशासन स्तरावरच्या खेळ्या खेळाव्यात त्या भाजपानेच. मग त्या वैध असो वा अवैध, सत्ता स्थापनेसाठी भाजप काहीही करू शकते, कालच्या निवडणुकीतही असाच वैध-अवैध व्यवस्थेचा आणि सत्ताकारणाचा खेळ झाला, असा आरोप होत असला तरी भाजपाला वरच्या स्तरावर रोखण्यात विरोधकांना या येत नाही. विरोधक त्यांच्यासमोर निपचीत पडतात, भाजपाला जनतेच्या दारातच रोखता येते, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. अनेकांना जनतेच्या निवडणुकांमध्ये गुलाल लागला नाही, मात्र व्यवस्थेच्या निवडणुकीत गुलाल लागला. एकूणच महाविकास आघाडीचा हा पराभव शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या आत्मविश्वासाचा फाजीलपणा एकीकडे असतानाच दुसरीकडे फडणवीस- शिंदे आणि धाकल्या पवारांची आगामी विधानसभेच्या रणनीतीची ही तयारी मानली जाते.