मुंबई (रिपोर्टर): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणार्या लाभार्थ्यांची गेल्या काही महिन्यांपासून छानणी केली जात आहे. शेतकरी सन्मान योजनेमध्ये नावे असणार्या महिला शेतकर्यांना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. राज्यात 19 लाख महिला शेतकर्यांची संख्या आहे. आयकर भरणार्या महिलांबाबतही येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्यांना देखील योजनेपासून वंचित ठेवण्याचा विचार शासनाचा आहे. निकषामध्ये अपात्र ठरणार्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार राज्यातून अडीच कोटी महिलांनी अर्ज भरले होते . अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो, तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले. त्यात परराज्यातील महिला देखील होत्या. विधानसभेच्या निकालानंतर राज्य स्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषांच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली. त्यात राज्यभरातील 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या.
तर शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेणार्या 19 लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला 500 प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला. आता आयकर भरणार्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे. योजनेचा आगामी हप्ता 25 एप्रिलपूर्वी वितरित होईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
‘या’ योजनांमधील लाडक्या
बहिणींना दरमहा 500 रुपयेच
सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थी शेतकर्यांची संख्या पाच लाख 18 हजार इतकी आहे. त्यात एक लाख 40 हजार महिला आहेत. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या महिला शेतकर्यांना ‘लाडकी बहीण’मधून दरमहा अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत.