तीन बेवड्यांमुळे बीड शहर झाले तंग
गोहत्या बंदीचा कायदा तंतोतंत पाळा, गोहत्या करणार्यावर गुन्हे दाखल करा परंतु तथाकथीत गोरक्षकांची गुंडागर्दीला तात्काळ आळा घाला, धार्मिक तेढ करू पाहणार्यांचे कोम्बिंग ऑपरेशन करा
बीड (रिपोर्टर): लोकशाहीतल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याहेतू धार्मिक भावनांचे शस्त्र समोर करत काही तथाकथीत गोरक्षक राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करू पहात असल्याचे चित्र राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पहावयास मिळत असतानाच काल रात्री बीड शहरातही अशाच तथाकथीत गोरक्षकांच्या तथाकथीत वागण्यामुळे बीड शहरातले वातावरण काही काळासाठी तंग झाले होते. राज्य शासनाने गोहत्या आणि गोवंश हत्या बंदीचा कायदा केलेला असताना तथाकथीत गोरक्षक स्वत:ला साक्षात न्यायाधीश समजत कमरेला शस्त्र, हातात तलवारी, चाकू घेऊन ज्या पद्धतीने आम्हीच खरे गोरक्षक म्हणून छाती पिटवतात, ते सर्रास बेकायदेशीर आहे. जर कोणी गाय अथवा गोवंशाचे मांस घेऊन जात असेल तर तो नक्कीच दोषी आहे. त्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी आणि गोरक्षकांना त्यासाठी माहिती मिळाली असेल तर ती थेट पोलिसांना द्यावी, गोरक्षकांना कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला कोणी? असा जळजळीत सवाल आता सर्वस्तरातून व्यक्त होत असून असे जे तथाकथीत गोरक्षक म्हणून मिरवणार्या, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणार्या लोकांवरही कारवाई करण्याची नितांत गरज आहे.
आधीच जाती-पातीच्या वादात मेटाकुटीला आलेल्या बीड जिल्ह्यात आता धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय? असा संशय रात्रीच्या घटनेवरून येत आहे. काल सायंकाळच्या दरम्यान बीड शहरातल्या साठे चौकात जी घटना घडली अन् त्या घटनेतून धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले, मारामारीची घटना घडल्यानंतर ज्या अफवा शहरात पसरल्या त्या चिंताजनक होत्या. गोमांस पकडले, हिंदू-मुस्लिमांची दंगल झाली, मुसलमान जाणीवपुर्वक गोमांस विक्री करतात यासह अन्य अफवांमुळे काल सकाळपर्यंत एकमेकांच्या गळ्यात हात टाकणारे हिंदू-मुसलमान रात्री एकमेकांवर वार करण्यास तयार आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली, ती केवळ भावनेला आणि श्रध्देला शस्त्र समोर करून आपली पोळी भाजून घेणार्या तथाकथीत गोरक्षकांमुळे.
राज्यामध्ये गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायदा आहे. जर कोणाला गोहत्या अथवा गोवंश हत्या केल्याची माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, दोषींवर पोलीस कारवाई करतील. कायदा असल्याने त्या कायद्याचे तंतोतंत पालन झालेच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्या कायद्याच्या आडून, श्रध्देला समोर करून जे काही गोरक्षक स्वत:च्या कमरेला शस्त्र लावून बाहेर फिरतात ते बेकायदेशीर आहे, अशा लोकांवर पोलीस यंत्रणेने लक्ष ठेवत त्यांच्यावर कठोर करावाई करायला हवी. रात्री मासे घेऊन जाणार्या छोट्या टेम्पोला तीन तथाकथीत गोरक्षकांनी त्याच्यामध्ये मांस असल्याच्या संशयावरून अडवले, बुलेटवर आलेल्या तिघांपैकी एकाने पाठीमागे लावलेले शस्त्र काढले. ते संबंधितांविरोधात उगारलं आणि तेथून शहरात वातावरण तंग झालं.
बीड शहरातील जनता सुजान आहे मग त्यात हिंदू असो वा मुसलमान. परंतु रात्री तीन लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे हिंदू-मुस्लिम आमने सामने आले आणि विविध अफवा रात्रभर शहरत पसरताना पहावयास मिळाल्या. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह हिंदू आणि मुस्लिम समाजातले समाजहितवादी घटनास्थळावर पोहचले म्हणून अनर्थ टळला. तात्पर्य हेच गोहत्या, गोवंश हत्या हा कायद्याने गुन्हा आहे, तो जो गुन्हा करेल त्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यापेक्षाही स्वत: न्यायाधीश होऊ पाहणार्या तथाकथीत गोरक्षकांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे.