
सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
मुंबई, (रिपोर्टर)ः- मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे. यातच आता राजकीय वर्तुळातूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे-उद्धवसेना युतीबाबत भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मी त्याचे स्वागत करेन, माझ्याही मनात तेच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र तर आनंदच आहे. कोणत्याही दोन संघटना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर चांगलेच आहे. शेवटी तो त्यांचा विषय आहे. एका सशक्त लोकशाहीत कोणी कोणासोबत काम करायचे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.