
पूररेषेत अपार्टमेंटची बांधकामे, बेकायदा शंभर ते दीडशे वर्षांच्या झाडांची कत्तल
पंचनामा होऊनही कारवाई नाही, पूररेषेत बांधकामे कसे?
बीडला पुरापासून वाचवायचे असेल तर कलेक्टर साहेब, पूरेषेतल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, भविष्यात होणार्या बेकायदा अपार्टमेंटवर लक्ष ठेवा, लोका हो, तुम्ही चिचुके नाही पैसे देताय, पूररेषेत बांधकामे करू नका, अपार्टमेंट घेऊ नका
बीड (रिपोर्टर): बीड शहरातून वाहणार्या बिंदुसरा नदीचे पात्र तब्बल 300 मिटरचे असताना आज मात्र त्या नदीच्या पात्राला नाल्याचे स्वरुप आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नगरपालिका आणि जलसंपदा विभागाच्या मिलिभगतसह भ्रष्ट वृत्तीमुळे भूमाफिया सर्रासपणे नदीपात्राच्या पूररेषेत टोलेजंग अपार्टमेंट उभे करून सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळ खेळत आहेत. एवढेच नव्हेतर पूररेषेत बांधकाम होत असल्याने भविष्यात बीड शहराला पुरपरिस्थितीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात असून गेल्या काही दिवसात रेडझोनच्या जागेत मंदिरे उभे करून पुढे अपार्टमेंट उभे करण्याचे ध्येयधोरण काहींनी आखल्याचे दिसून येत आहे. याची पुर्वतयारी म्हणून या भागातले शंभर ते दीडशे वर्षाच्या झाडांची कत्तलही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा अधिकृत शासकीय पंचनामा झाल्यानंतरही आणि बीड नगरपालिकेने बांधकाम अडवल्याने काही ठिकाणचे बांधकाम सर्रासपणे सुरू आहेत. जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वस्तरातून होताना दिसून येते.
इ.स.1980 च्या आसपास बीड शहरातून वाहणार्या बिंदुसरा नदीचे पात्र तब्बल 300 मिटरपेक्षा अधिक होते, कालांतरानंतर आज या नदीचे पात्र पाहिले तर शंभर मिटरच्या आसपास असेल. मध्यंतरी जो चाळीस-पन्नास वर्षांचा कार्यकाळ गेला या कार्यकाळात नगरपालिकेने उभ्या बीड शहरातला कचरा नदी पात्रात आणून टाकला. सुरुवातीला कचरा टाकताना पाहत असलेले लोक याकडे दुर्लक्ष करत होते, मात्र हा कचरा टाकण्यामागचा प्रमुख उद्देश गेल्या वीस वर्षांच्या कालखंडामध्ये पहायला मिळत आहे. नगरपालिका आणि त्यावर सत्ताकारण करणार्यांनी निव्वळ आपल्या भूमाफिये बगलबच्च्यांना फायदा करून देण्यासाठी हा सर्व धंदा केल्याचे स्पष्ट होते. आता बिंदुसरा नदीचे पात्र स्वच्छ केले, तेव्हा त्या पात्राचे क्षेत्र पहिले किती आणि आता किती? हे स्पष्टपणे जाणवू लागले. बीड शहरात मोंढा भागात पुलाच्या अलिकडे जी जुनी स्मशानभूमी आहे त्याच्या बाजुला रस्ताही करण्यात आला आणि शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचे अठरा-वीस झाडे तोडण्यात आली. जेव्हा सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवला तेव्हा त्याचे पंचनामे झाले. मात्र वृक्षतोड करणार्यांवर कुठलीही करावाई झाली नाही. विशेष म्हणजे या नदी पात्राच्या पूरक्षेत्रात याआधी अनेक बांधकामे झाले आहेत. त्या बांधकामांना नगरपालिकेने परवाने दिले कसे? आणि न.प.ने परवानगी दिली नसेल तर मग बांधकामे केले कसे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता पूरक्षेत्रात बांधकाम करण्याहेतू काही ठिकाणी मंदिर उभे केले जात आहेत. मंदिर उभे केले की, भविष्यात त्याठिकाणी अपार्टमेंट होणार हे निश्चित. नदी पात्रातील आजची परिस्थिती भविष्यात बीड शहराला धोकादायक वळणावर घेऊन जाणारी आहे. तीनशे मिटरचे पात्र आज काही ठिकाणी शंभर आणि काही ठिकाणी शंभरपेक्षा कमी होत असेल तर भविष्यात नदीपात्रात पूर आला तर पूरक्षेत्रातल्या बांधकामांचे काय होईल? त्यापेक्षाही बीड शहराचे काय होईल? हे सांगणे कठीण. हे सर्व नगरपालिका, भूमाफिये आणि शासन-प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्ट लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचार्यांमुळे होत आहे. भविष्यात बीड शहराला भयावह परिस्थितून वाचवण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी आत्ताच पूरक्षेत्रातल्या बांधकामावर त्याचबरोबर बांधकाम करू पाहणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. जे झाडे तोडण्यात आलेले आहेत, ज्याचे पंचनामे झालेले आहेत त्या दोषींवरही कारवाई व्हावी, असे बीड शहरातल्या नागरिकांचे मागणे आहे.
करपरा नदीच्या कडेनेही अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकामे
बालेपीर भागातून करपरा नदी वाहते. या करपरा नदीचा देखील नाला झाला असून बालेपीर ते पांगरी रोड या दरम्यान अनेक ठिकाणी नदीच्या अगदी काठोकाठ बांधकामे करण्यात आले आहेत. मोठा पूर आला तर सदरील बांधकामाच्या ठिकाणी पाणी येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बालेपीरच्या वरच्या भागातही बहुतांशी ठिकाणी बांधकामे करण्यात आले आहेत. पूररेषेत बांधकामे झाले असतानाही नगरपालिकेने जाणीपुर्वक दुर्लक्ष केले आहे. भविष्यात महापूर आल्यानंतर हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार?