अमरावती (रिपोर्टर): शेतकर्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने आणि सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आता विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधत प्रकृतीची चौकशी केली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.
दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केलं जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी ( बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोन वर बोलणं करून दिलं. यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडीलकीचा सल्ला दिलाय. अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्याआंदोलन स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या असून त्यामध्ये शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन, शेतीमालाला एमएसपी किंमत दरावर 20 टक्के अनुदान देण्यात यावे, दि. 6 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावा, आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबियांना स्वतंत्र महामंडळ स्थापून दहा लाखांची आर्थिक मदत द्यावी यासह अन्य मागण्या घेऊन ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज त्यांच्याशी एकीकडे संवाद साधलेला असताना दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठींबा दिचला आहे.