बीड (रिपोर्टर): एक एप्रिल 2019 च्या पूर्वी विक्री झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. यामुळे आरटीओ विभागाने 16 जूननंतर विना एचएसआरपी नंबर बसविलेल्या किंवा नंबरप्लेटसाठी बुकिंग न केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांचे आरटीओशी निगडित कामे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयात दहा लाख वाहनांच्या वर वाहनांची नोंदणी आहे. यातील सात ते आठ लाख वाहने जिल्ह्यात धावत आहेत. यातील अनेक वाहने ही 1 एप्रिल 2019 च्या पूर्वीची आहेत. या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना लवकरात लवकर हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसवून घ्यावे. यासाठी आरटीओ विभागाने संबंधित एचएसआरपी नंबर प्लेट बसविणार्या कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क करून, शहरात आणि जिल्ह्यात फिटमेंट सेंटर बसविण्याबाबत सूचना केली होती.
या अनुषंगाने वाहनधारकांच्या सुविधेसाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली आहे. आतापर्यंत 50 हजार 902 नंबर प्लेट संबंधित वाहनांना लावण्यात आलेल्या आहेत. एचएसआरपी एजन्सीकडे सध्या 70 हजार 170 एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बुकिंग करण्यात आले आहे. सध्या 27 हजारांपेक्षा अधिक वाहने नंबर प्लेटसाठी वेटिंगवर असल्याची माहितीही समोर आली आहे.
ही संख्या वाढविल्यानंतरही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी आवश्यक प्रतिसाद नागरिकांना मिळत नाही. यामुळे दोन जून रोजी आरटीओ विभागाने विशेष आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार एक एप्रिल 2019 च्या पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम वगळून, वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी कामे वाहनांना एचएसआरपी बसविल्याशिवाय होणार नाही. असे आदेश जारी करण्यात आले आहे. सदर आदेश 16 जूनपासून आरटीओ कार्यालयात लागू होणार आहेत, अशीही माहिती विजय काठोळे यांनी दिली.
नोंदणी असल्यासच होणार कामे
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी ज्या वाहनधारकांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांच्या नंबर प्लेट पाठविण्यात येणार आहेत. अशा वाहनधारकांकडे बुकिंगची पावती असेल तर या पावतीची खातरजमा केल्यानंतर संबंधित वाहनांची आरटीओ कार्यालयांमध्ये कामे करण्यात येणार आहेत, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.











