खरिपात फार्मर आयडीसाठी धडपड; शासकीय योजनांसाठी बंधनकारक
पात्रुड:(प्रतिनिधी)मॉन्सूनची चाहूल लागली असून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत लागले आहेत. खरीप पेरणीपूर्व कामे आटोपण्याच्या लगबग सुरू असताना फार्मर आयडीसाठीही शेतकर्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक सरकारी योजना, जसे की, पीकविमा आणि नुकसानभरपाई फार्मर आयडीशिवाय मिळत नाहीत. केंद्र सरकारने फार्मर आयडी अनिवार्य केल्याने जिल्हाभरातील सेतू केंद्रांवर शेतकर्यांची गर्दी उसळलेली दिसून येत आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करीत फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केल्यास शेतकर्यांना डिजीटल ओळख मिळणार आहे.
याद्वारे शेतकर्यांकडील जमीनधारणा, ते घेत असलेले पीक, कोणत्या क्षेत्रात सिंचन व्यवस्था आहे, कोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत किंवा घेतला याची अचूक माहिती शासनाला मिळणार आहे. याच फार्मर आयडीच्या आधारे शेतकर्यांना वेळीचअनुदान व मदत देणेदेखील शक्य होईल. खरीप हंगामातील कृषी योजना, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, बियाणे व खते अनुदान, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व अर्जासाठीही या आयडीची गरज भासणार आहे. सद्यस्थितीत शेतकरी खरीप हंगामात व्यस्त असताना या हंगामात शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी काढण्यासाठीही धडपडताना दिसत आहे. वीज, इंटरनेटचा खोडा: राज्यभरातील शेतकर्यांसाठी आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली. शासनाच्या विविध कृषी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी हा आयडी आवश्यक आहे. अन्यथा शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, असे शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शेतकरी फार्मर आयडी बनविण्यात व्यस्त आहेत. मात्र विजेचा लपंडाव आणि इंटरनेटचा खोडा कायम असल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.