बीड (रिपोर्टर): यावर्षी पाऊस न पडल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग आणि कापूस ही तिन्ही पिके शेतकर्यांच्या हातची गेली असून ऐन पावसाळा संपण्याच्य तोंडावर आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे सावट गडद झाले असून खरीप पिकाची नुकसानीची पाहणी करण्यासाठी रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर केंद्राच्या तीन अधिकार्यांची टीम आज संध्याकाळी बीड जिल्ह्यात दाखल होणार आहे. आता हे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी रब्बीचे पीक उगवल्यानंतर खरीपाचे पीक कायद दाखवणार आणि केंद्राची टीम नुकसान कसे मोजणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला. कापसाचे पन्नास टक्के उत्पादन घटले. तर सोयाबीन, उडीद, मूग हे नावालाच पिके आली. शेतकर्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी वारंवार मागणी झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली. केंद्रानेही याची तात्काळ दखल न घेता रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर ही टीम खरीपाचे नुकसान मोजण्यासाठी बीड जिल्ह्यात आज येणार. यामध्ये सहाय्यक संचालक मोतीराम केंद्र सरकार, निती आयोगाचे संशोधन अधिकारी एस.ई. मीना आणि केंद्र सरकारचे अव्वर सचिव मनोज कुमार हे तीन अधिकराी आज संध्याकाळी बीड जिल्ह्यात येत अहेत. उद्यापासून त्यांचा नुकसान पाहणी दौरा सुरू होणार आहे. या पाहणी दौर्यामध्ये ते शिरूर, बीड, वडवणी आणि पाटोदा या तालुक्यातील कापूस, काढलेले बाजरीचे पीक, सोयाबीन, उडीद आणि मध्यम व लघू पाण्याचे प्रकल्प बघणार आहेत. उद्या दिवसभरात ही पाहणी करून ही टीम धाराशीव जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. टीम गेल्यानंतर किमान महिना दोन महिन्याने केंद्र सरकारला आपला अहवाल दिल्यानंतर त्यानुसार ऐन उन्हाळ्यामध्ये खरीपाची नुकसानीची थोडीफार मदत शेतकर्यांना मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कधीही शेतकरी आणि सामान्य माणसाच्या समस्यांकडे केंद्र आणि राज्य सरकार वरातीमागून घोडे हाकलतात असे म्हणावे लागेल.