गणेश सावंत
बीडचा इतिहास हा संघर्षाचा आहे, संकटाचा आहे. दुष्काळ दारिद्य्र, राजकीय उपेक्षा, सततची अस्थिरता या सगळ्यात बीडचा पदर कायमचा फाटका राहिला. कुठं आम्ही चार घास सुखाचे खावू, थोडंसं स्थैर्य पाहू असा विचार करत असलो की काळ आमच्या पाठीशी उभा राहतो आणि पुन्हा एकदा आशेचा आधार हिरावून नेतो. या दशकात तर जणू काळ हा केवळ बीड जिल्ह्याच्या छाताडावर अक्षरश: नागवा थयाथया नाचतोय जणू. त्याला बीड जिल्ह्याचं सुख पचणीच पडत नाही. बीड जिल्हा मायेच्या आधाराने आणि उबेने थोडासा सावरायला लागला की काळ त्याचा आनंद अक्षरश: हिसकावून घेतो, ओरबाडून घेतो. नखशिकांत त्या बीडच्या माणसांना तो पुन्हा मानसिकदृष्ट्या रक्तबंबाळ करून टाकतो. काळाला वेळ नसती असे आमचे बापजादे म्हणायचे पण काळ जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यासाठी वेळ ठरवून आणत आहे. आमच्यातले लाखाचे पोशिंदे भल्या सकाळी काळ सातत्याने घेवून जातोय. बीडच्या बाबतीत काळ वेळ नक्कीच ठरवतो. त्याला आमचा पदर कायम फाटका ठेवायचाय. आज सकाळी महाराष्ट्रातला एक फर्डा नेता कर्तव्य कर्माला अनन्य साधारण महत्त्व देणारा, बहूजनांचा आवाज असणारा आमचा दादा काळाने हिरावून नेला. विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बीड जिल्हा पुन्हा एकदा पोरका झाला.
अजितदादा कोण
असं जर महाराष्ट्राच्या माणसांना विचारलं तर ते विचारणार्यालाच मुर्खात काढतील. गेली तीन दशके अजित पवार उर्फ दादा हे राजकारणात सक्रीय आहेत. नुसते राजकारण नव्हे तर समाजकारणातही ते अग्रेसर आहेत. ते नेहमी म्हणतात मी काम करणारा माणूस आहे. त्यांचे हे वाक्य नुसते बोलघेवडे नव्हते हेही तेवढेच त्रिवार सत्य. महाराष्ट्रातल्या राजकारणातला नव्हे तर देशातल्या राजकारणातला हा पहिला नेता असेल ज्याचे काम भल्या सकाळी 5.30 ते 6 ला प्रत्यक्षात सुरू होत होते. ते रात्री 11 वाजेपर्यंत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जेव्हा अजितदादांनी स्वत:कडे घेतले अन् त्यांनी बीड जिल्ह्यात पहिले दोन मुक्काम ठोकले तेव्हा बीड जिल्हावासियांना अजितदादांच्या कामाची पद्धत कळाली. सकाळी 5:30 – 6 ला प्रत्यक्षात कामाच्या स्थळी हजर राहणारा हा नेता पाहून बीडकर पुर्णत: भारावून गेले. आता बीड शहराबरोबर जिल्ह्याचा कायापालट होणार, आधीच्या काही दु:खद घटनातून सावरलेल्या बीडकरांनी अजितदादांच्या पालकत्वात सुख शोधलं अन् तिथंच हे सुख अवघे तीन महिनेही काळाने टिकू दिलं नाही. ऊसतोड कामगारांचा, कष्टकर्यांचा, मजूरांचा हा जिल्हा. या जिल्ह्याने या आधीही असे हादरे सहन केले. मात्र आज अजितदादांच्या जाण्याने पुन्हा एकदा दशकभरातल्या वेगवेगळ्या जखमांच्या खपल्या पुन्हा एकदा टोकरल्या गेल्या.
गोपीनाथराव असेच
भल्या सकाळी आमच्यातून निघून गेले. तेव्हाही काळाने बीड जिल्हावासियांच्या छाताडावर निर्दयीपणे पाय दिला. गोपीनाथराव महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपदापर्यंत गेले. अत्यंत मागास म्हणून पाहिल्या जाणार्या बीड जिल्ह्याला आता 21 व्या शतकात कुठे सुखाचे चार घास खाता येणार असे वाटत असतांना काळ बीडकरांच्या मानगुटीवर बसला. 2014 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गोपीनाथराव दिल्ली दरबारी होते. मानाचं मंत्रीपद गोपीनाथरावांना देण्यात आलं होतं. अवघा जिल्हा गोपीनाथरावांच्या स्वागतासाठी आस लावून बसलेला होता. बीड अगोदर गोपीनाथराव भगवान गडावरून चौंडीला गेले, तेथून ते परत दिल्लीला परतले. दोन दिवसांनी गोपीनाथराव बीडमध्ये येणार की 3 जूनच्या भल्या सकाळी टेलिव्हिजनवर दु:खद बातमी धडकली. बीड जिल्ह्याचा पोशिंदा अपघातात निपचित धारातिर्थ पडला. आमच्यासह अखंड बीड जिल्हावासियांचे अक्षरश: हातपाय गळाले. काळाने पुन्हा संधीसाधली आणि आमच्या कर्त्याला आमच्यातून हिसकावून नेलं. बीड जिल्ह्याच्या भविष्याचे स्वप्न काळवंडले, धुळीस मिळाले, काळोखात बुडाले. तेव्हा आम्हाला वाटलं आम्ही बीड जिल्ह्यापूरते बोलतोय. आम्ही आमचा गोपीनाथरावांमध्ये स्वार्थ पाहतोय. तेव्हाही आम्ही म्हटलं होतं, हे काळा, गोपीनाथराव नुसत्या बीडचे पोशिंदे नव्हे ते राज्याचे पोशिंदे होते. नव्हे नव्हे देशातल्या कष्टकर्यांचे आणि बहुजनांचे पोशिंदे होते. तेव्हाही उभ्या महाराष्ट्राने काळाला शिव्या शाप दिले. परंतू
काळ निर्लज्जच
गोपीनाथरावांचं दु:ख ओलावल्या डोळ्यांच्या काठांमध्ये साठवून काठातले पाणी गालावर ओघळले ते पाणी दिवसामागून दिवस जात असतांना सुकत गेले. गोपीनाथरावांच्या आठवणीत जिल्हावासी संघर्ष करत राहिले. अन् पुन्हा एकदा 8 वर्षांनी काळाने बीड जिल्ह्याच्या छाताडावर पाय देण्याची परंपरा कायम ठेवली. 14 ऑगस्ट 2022 साली पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा नेता आमच्यातून हिरावून नेला. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे हे अखंड मराठा समाजासाठी आणि बहूजनांसाठी एक लढते वादळ होते. अत्यंत गरीब कुटुंबातला हा नेता कित्येकांचा पोशिंदा होता. मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा देत होता. त्यामुळे गोपीनाथरावांनंतर विनायक मेटेंकडे जिल्हावासी पोशिंदा म्हणून पाहू लागला परंतू काळाला तेही जमले नाही. त्याने पुन्हा आपला विखारी फणा उभा केला. आरक्षणाच्या महत्त्वपुर्ण बैठकीसाठी विनायक मेटे हे बीडवरून मुंबईकडे निघाले आणि भल्या सकाळी मेटेंचा अपघात झाला अन् त्यात काळाने पुन्हा एकदा विनायकाला तुमच्या आमच्यातून हिसकावून नेले. जिल्हावासी जेव्हा जेव्हा सुखाचे चार घास खावू अशी आस धरत राहिला तेव्हा तेव्हा काळाने तोेंडासमोरचा घास हिसकावून नेला, आजही तेच झाले.
दादा आमच्या भल्यावर
पहाटे 6 वाजल्यापासून काम करू लागले. अन् काळाला इथंच बीड जिल्ह्याचं सुख पहावलं नाही. आधी गोपीनाथराव नंतर विनायकराव आणि आता अजितदादा यांना काळाने हिसकावून घेतलं. राज्याचे 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद भुषवणारे कायम महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले अजितदादा आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात बीडचा चेहरा मोहरा बदलू लागला होता. पाण्यापासून सडकेपर्यंत हे तर मुलभूत प्रश्न परंतू औद्योगिकीकरणाकडे अजितदादा बीडला घेवून जाण्याच्या तयारीत होते. आता बदल घडणार, बीडचे पारणे फिटणार, उद्योगधंद्यांसह बीडच्या विकासाला चालना मिळणार हा विश्वास दृढ झाला होता. दादा आल्या आल्या प्रशासन ज्या पद्धतीने हालत होतं, शहर स्वच्छ करत होतं ते पाहून प्रत्येक बीडकर या पाच वर्षात बीडचा भाव आजच्या सोन्या चांदीसारखा वाढता राहिल अशा प्रतिक्रिया देत होते, मात्र काळाला बीडकरांचा तो आनंद सहन झाला नाही, आणि आज सकाळी बातमी आली अजितदादांचं विमान बारामतीत कोसळलं, दुसर्या क्षणी बातमी आली या अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला. आम्ही म्हटलं हे काळा तुला आमचा पदर फाटकाच ठेवायचाय….! परंतू एक लक्षात ठेव तुला विजयी मिरवणूकीमध्ये थयाथया नाचवणारा आज ना उद्या मिळेल.









