
उपोषणस्थळी जलसंधारणमंत्री संजय राठोड दाखल
सहा दिवसांपासून शेतकर्यांसाठी बच्चू यांचे आमरण उपोषण
अमरावती (रिपोर्टर): महायुती सरकारने शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू हे अमरावती येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून आज सरकारतर्फे चर्चेसाठी राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. राठोड यांच्याकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम होते.
महायुती सरकारने अनेक आश्वासन दिले होते. त्यामध्ये शेतकर्यांची कर्जमाफी करू, असे एक महत्वाचे आश्वासन होते. शासनाने अद्यापही शेतकर्यांना कर्जमाफी दिलेली नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याने शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे, त्यांना कर्जमाफी द्यावी तसेच गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव देण्यात यावा, मजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी, लागवड ते कापणी सर्व शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेमध्ये करण्यात यावा, तेलंगाणाच्या धर्तीवर शेतकर्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आज सरकारतर्फे चर्चेसाठी मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना पाठवण्यात आले आहे. राठोड व बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम होते. दुपारपर्यंत तोडगा निघालेला नव्हता.
परवा बीडमध्ये स्वाभिमानीचा रास्ता रोको
तालुक्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
शेतकर्यांच्या प्रश्नासाठी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थन असून परवा बीड येथील जालना रोडवर असलेल्या महालक्ष्मी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी म्हटले आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.