जखमी जिल्हा रुग्णालयात; घटनास्थळी अंमळनेर पोलिसांची धाव
बीड (रिपोर्टर): एका लग्नात झालेला किरकोळ वाद मिटवण्यासाठी बसलेल्या बैठकीत वाद चिघळला आणि यात एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्या दरम्यान आलम बशीर शेख याने आपल्या जवळील पिस्तुलातून थेट गोळीबार केल्याने या गोळीबारात किशोर गाडे यांच्या खांद्यात गोळी घुसली तर देवीदास सुळे यांच्या पायाजवळून मांडीत गोळी घुसून ते जखमी झाले. सदरची थरारक घटना ही पाटोदा तालुक्यातील चिखली गावात घडली. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी अंमळनेर पोलीस डेरेदाखल झाली असून जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सदाशीव राऊत व त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया करून गोळी काढल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, पाटोदा तालुक्यातील चिखली व अंतापूर येथील रहिवासी असलेले आलम बशीर शेख व किशोर गाडे हे दोघे काल-परवा बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात विवाह समारंभ प्रसंगी सोबत गेले होते. तिथे जुना वाद उकरून त्यांच्यात काही तरी बेबनाव झाला. हा वाद मिटवण्यासाठी आपण गावाकडे बैठक बसवू, असे दोघांमध्ये ठरले. त्यानुसार त्यांनी रात्री चिखली येथे वाद मिटविण्यासाठी बैठक बसवली. मात्र वाद मिटण्यापेक्षा इथे वाद सुरू झाले. दोघात सुरुवातीला शाब्दीक चकमक उडाली.
त्यावेळी किशोर गाडे याने सशस्त्र हल्ला चढवला. त्यावेळी आलम बशीर शेख यांनी स्वत:च्या पिस्तुलातून थेट गाडेंच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी किशोर यांच्या खांद्यात घुसून थेट पाठीमागे पाठीत निघाली. याच गोळीबारात उपस्थित असलेला देवीदास सुळे नावाचा व्यक्तीही जखमी झाला. त्याच्या मांडीत गोळी घुसली. यातील गोळीबारात जखमी झालेल्या सुळे आणि गाडे या दोघांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रात्रीच दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सदाशिव राऊत व त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया करून जखमींच्या शरीरातली गोळी काढली. या घटनेची माहिती अंमळनेर पोलीसांना माहित झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव गेतली असून परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले.