आघाडीकडून निवडणूक लढण्याचे बहुतांश कार्यकर्त्यांचे म्हणणे
बीड (रिपोर्टर): राजकीय वनवासात राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा म्हणजेच शिवसंग्राम कुटुंबाचा यथायोचीत सांभाळ करण्यासाठी ज्योतीताई मेटे यांनी खासदारकीची निवडणूक लढवलीच पाहिजे, अशा आशयाचा सूर आज शिवसंग्राम पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीतून निघाला. मेटे साहेबांच्या निधनानंतर उघडे पडलेल्या शिवसंग्राम कार्यकर्त्यांना ताईंनी मोठा आधार दिला. आता त्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणूक लढवल्याशिवाय पर्याय नाही आणि ही निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवावी, असेही अनेक कार्यकर्त्यांनी या बैठकीत बोलून दाखवले.
शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, म्हणून शरद पवार यांच्याकडून सातत्याने निरोप येत असल्याचे सांगण्यात येते. तशी कबुलीही ज्योतीताई मेटे यांनी दिली, त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपण कार्यकर्ते व समाजाच्या भावनेसोबत जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आज शिवसंग्रामच्या पक्ष कार्यालयामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांची याचबाबत बैठक होत आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्षापासून शिवसंग्रामच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या बैठकीस ज्योतीताई मेटे या उपस्थित नव्हत्या. मुंबईमध्ये त्यांच्यासोबत काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होत असल्याचे सांगण्यात येते. आज सकघाळी जेव्हा सुरू झाली तेव्हा या बैठकीला जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, नामदेवराव गायकवाड, कैलास माने, सुग्रीव मुंडे, माऊली शिंदे, उत्तम पवार, मुजीब सर, सुहास पाटील, गणेश ढवळे, बाळासाहेब गलांडे, मनोज जाधव, साक्षी हंगे, मनीषा सुपेकर, या सर्वांसह अन्य काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी आता ज्योतीताई यांनी लोकसभेची निवडणूक लढविलीच पाहिजे, समाजासह कार्यकर्त्यांच्या तशा भावना आहेत. ज्योतीताई मेटे या सर्व समाजाला सोबत घेऊन काम करत आल्या आहेत. ही संधी आता गमवू नये, असं म्हणत सर्वच पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा सूर आळवला. तर बहुतांश कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचे स्पष्टपणे सांगितले.