गावागावांत सुरू झाला व्यवसाय
पात्रुड /(खतीब एजाज) प्रत्येक लग्नकार्यातच नाही, तर कुठलाही कार्यक्रम असो पिण्यासाठी थंड पाण्याचे जार आणले जातात. तप्त उन्हात पाणी थंड लागते म्हणून लोक गटागटा पितात. मात्र, त्याच्या शुद्धतेची हमी काय ? याचा कोणीही विचार करीत नाही. त्यामुळे थंड पाणी पिल्यावर घशाचे आजार होऊ लागले आहेत. मात्र कार्यक्रमात जारचे पाणी वापरणे बंद न होता ते अविभाज्य झाले आहे.
लग्नकार्य व इतरही कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जारच्या थंड पाण्याचा वापर होतो. अलीकडे अनेकांच्या घरीही थंड पाण्याचा जार शुद्ध पाणी म्हणून आणल्या जाते. या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, पाणी शुद्धतेची हमी कुणालाही घेता येत नाही. जार विकणारे व्यावसायिक ते पाणी शुद्ध असल्याचे सांगतात. मात्र, त्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना ते पाणी पिण्याची वेळ सर्वांवर आली आहे. 18 ते 20 लिटरचा पाण्याचा जार 35 ते 40 रुपयेला मिळतो, या पाण्याची उन्हाळ्याच्या दिवसात मोठी उलाढाल होते. याचबरोबर बाटलीबंद पाण्यालाही सुगीचे दिवस येतात. आठ ते दहा रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली 20 रुपयाला विकली जाते. शुद्ध पाणी म्हणून प्रवासात इतर पाणी न पिता लोक आवडीने ही बाटली घेत आपापली तहान भागवितात. काही ठिकाणी प्रवास करताना हे 20 लिटरचे जारही ढीग लावून विक्रीसाठी उपलब्ध असतात. बाटलीबंद पाणी व जारचे पाणी किती शुद्ध आहे.याबाबत कुणाला काहीच माहिती नसते. हे सत्य असले तरी लोक थंड पाणी म्हणून आवडीने घेऊन आपली तहान भागवितअसतात.